पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/16

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोठ्या विस्तारानं मांडलं, त्यासाठी शंकास्पद विश्वसनीयतेच्या वेदोपनिषदकालीन साहित्याचं त्यांनी एखाद्या महामहोपाध्यायापेक्षा विस्तारानं अवगाहन केलं. याउलट, मुसलमानी आक्रमणापासूनच्या इतिहासाचा अन्वय लावण्याचं काम मार्क्सवाद्यांनी फार किरकोळ केलं,' मध्ययुगीन राजेरजवाड्यांच्या एकमेकांतील लढाया' असा शिक्का मारुन हा उभा कालखंड त्यांनी दुर्लक्षित केला. सैद्धान्तिक दृष्टिकोनातून त्यांनी हा इतिहास तपासून बघितला असता तर इतिहासाचा पुरा अर्थ मार्क्सच्या विश्लेषणातही लागत नाही हे त्यांच्यासुद्धा लक्षात आलं असतं.

 पश्चिमी इतिहासकारांचं लिखाण वाचताना जागोजाग असमाधान राहतं. लेखकाला देशाची कल्पना किती तुटपुंजी आहे याची ओळीओळीला जाणीव होते. ते साहजिकच आहे. पण भारतीयांनी लिहिलेला भारताचा किंवा महाराष्ट्राचा इतिहास वाचतानाही त्याच प्रकारचं असमाधान वाटतं. या इतिहासातले धागे एकमेकांशी जुळत नाहीत. कुठेतरी काहीतरी चुकतं आहे अशी रुखरुख लागून राहते. ( शरद जोशी - रामदेवरायाचा धडा-प्रचलित अर्थव्यस्थेवर नवा प्रकाश)

 इतिहासाच्या या अनेक मांडण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या परिस्थितीला स्थान कुठेही नाही. इतिहासाची एक मांडणी महात्मा जोतिबा फुल्यांनीही केली. आजवरच्या कोणत्याही मांडणीत संपत्ती - उत्पादक शेतकऱ्याला स्थान नव्हते. ते महात्मा फुल्यांच्या मांडणीत आहे.

 "इतिहासाचा अर्थ सलगपणे, एका सूत्रामध्ये ओवण्याचं पहिलं काम महात्मा जोतिबा फुल्यांनी केलं, अगदी विष्णूच्या मत्स्यावतारापासून ते वासुदेव बळवंत फडक्यांच्या बंडापर्यंत -'शूद्रांची गुलामगिरी' या एका सूत्रात त्यांनी सर्व घटना गुंफून दाखवल्या. राष्ट्रवादी आघाडीची पर्वा न करता त्यांनी मोगलांना शूद्रांच्या मुक्तद्दचं श्रेय दिलं.

 ('आर्य धर्म श्रेष्ठ भट वाखाणीती। जुलमी म्हणती । मोगलास ॥ भटपाशातून शूद्र मुक्त केले। ईशाकडे नेले। कोणी दादा?' मानव- महंमद- महात्मा फुले सग्रम वाङ्मय, पृष्ठ ४९०) आणि राष्ट्रवाद्यांच्या महापुरुषांवर कडाकड आसूड उडवले. ('शेतकऱ्यांचा असूड' समग्र वाङ्मयः पृष्ठ २०१)

 'तेव्हा अखेरी शंकराचार्याने तुर्कि लोकास मराठ्यात सामील करून घेऊन त्यांजकडून तरवारीचे जोराने येथील बौद्ध लोकांचा मोड केला. त्यावर काही काळ लोटल्यानंतर हजरत महंमद पैगंबराचे जहामर्द शिष्य, आर्यभटांच कृत्रिम धर्मासहित सोरटी सोमनाथ सारख्या मूर्तीचा तरवारीच्या प्रहारांनी विध्वंस करून, शेतकऱ्यास आर्यांच्या ब्रह्मकपाटातून मुक्त करू लागल्यामुळे भटब्राह्मणांतील

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १३