पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आलेखामधील प्रत्येक बिंदू एक आर्थिक हितसंबंध दाखवतो. म्हणून त्या प्रत्येक बिंदूस साजेसा एक दृष्टिकोन, विचार तत्त्वज्ञान अर्थातच सरासरीच्या आसमंतातील गठ्ठा-लोकसंख्येला सोईस्कर तेच असणार; पण बहुमताच्या या लोंढ्याला न जुमानता आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार विचार होतच राहतो. यातील काहीजण त्यांच्या विचारांची मांडणी करतात, काहीजण करत नाहीत.

 अर्थशास्त्राच्या निर्देशांकाचे सरासरी मूल्य सदैव कायमच राहील असे नव्हे. इतिहासामध्ये ते वाढत राहील किंवा कमीही होत जाईल. आज समाजात जे बहुसंख्य आहेत त्यांचे हितसंबंध कालच्या बहुसंख्यांशी जुळत नाहीत, तर काल सरासरीपासून दूर असलेल्या एखाद्या एकांड्या शिलेदाराशी जास्त जुळतात.आणि मग कालचा बहिष्कृत एकाकी प्राणी आजचा महात्मा, प्रेषित आणि द्रष्टा म्हणून मान्यता पावतो.

 शेतकरी कामगार पक्षाचा पाया ग्रामीण समाजात होता; त्यातल्या त्यात ग्रामीण समाजातील उच्च सवर्णांत होता. शेतीवर जगणाऱ्या सर्व समाजाच्या अडचणींची जाणीव या मंडळींना झाली होती. या अडचणीतून सुटण्याकरिता शेतीतून निघून जगण्यासाठी आणि नोकरी शोधण्यासाठी एक मोठा प्रवाह चालू झाला होता. या नोकरमान्यांतही याच सवर्ण शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे होते. ग्रामीण असंतोषाची परिपूर्ण जाणकारी असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला आपल्या चळवळीचा आधार म्हणून निवड करण्यासाठी निदान दोन पर्यायी विचार उपलब्ध होते. पहिला मार्क्सवादी आणि दुसरा फुलेवादी. स्वातंत्र्याची चळवळ चालविणाऱ्या उदयोन्मुख व्यापारी कारखानदार-वर्गाशी सवर्ण शेतकरी-वर्गाचे काहीच नातेगोते नव्हते. त्यामुळे राष्ट्रीय मुख्य प्रवाहापासून शेतकरी कामगार पक्ष दूर राहिला, हे सहज समजण्यासारखे आहे. स्वातंत्र्यानंतर एक आठ महिन्यांचा काळ सोडला तर शेतकरी कामगार पक्ष काँग्रेसपासून दूरच राहिला. सवर्ण शेतकऱ्यांच्या हितसंबंधाची एका वेगळ्या तऱ्हेने जोपासना करणारे नेतृत्व संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाणांच्या छत्राखाली तयार झाले. सहकारी चळवळ आणि शासकीय प्रकल्प यांच्या आधाराने शेतकरी समाजातील बड्यांचा आणि प्रामुख्याने सवर्ण बड्यांचा हात ओला करून द्यावा आणि शेतीमालाला न्याय न देता, म्हणजेच कुणब्याला न्याय न देता सवर्ण शेतकऱ्यांचे भले करण्याची घाईगर्दी सुरू झाली. तेव्हा शेतकरी कामगार पक्षातील मार्क्सवादाच्या माळा जपणारे भले भले दिग्गज नेते काँग्रेसमध्ये सपातून गेले, त्याचे रहस्यही हेच आहे. चमत्कार 'साहेबां'नी फिरविलेल्या हाताचा नव्हता; त्या नेत्यांच्या हितसंबंधांना जपणारा जास्त अनुरूप विचार आणि पंथ सापडल्याचा हा चमत्कार होता.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १५२