पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/157

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 शेकाप : विचाराच्या परभृततेचा बळी


 शेतकरी कामगार पक्षाने शेतीमालाच्या भावाच्या प्रश्नाचा ऊहापोह केला. कशी का होईनात काही आंदोलनेही या प्रश्नावर उभी केली. याउलट सैद्धांतिक विचार मांडताना मात्र शेतीमालाच्या प्रश्नावर निखळपणे शेतकरीविरोधी मत मांडणारे मार्क्स, एंगल्स, लेनिन आणि स्टॅलिन यांचा स्वीकार केला. या चमत्कारिकपणाचा संगतवार अर्थ समजून घेणे उपयोगी ठरेल.

 शेतकरी कामगार पक्ष वस्तुवाद मानतो. शेतकरी संघटनाही वस्तुवादाच्या पायावर आपल्या विचारांची उभारणी करते. याचा अर्थ असा, की भोवतालच्या वास्तविकतेशी संबंध नसलेला असा चैतन्यमय, प्रकाशमय विचार कोण्या थोर व्यक्तीच्या मनात तयार होतो आणि त्या विचाराप्रमाणे या व्यक्ती जगाचा इतिहास बदलतात ही कल्पना दूर सारावयास हरकत नाही. विचाराने क्रांती होत नाही एवढेच नव्हे, तर विचाराने संघटनाही बनत नाही. प्रत्येक व्यक्तीचे आणि व्यक्तिसमूहाचे काही आर्थिक हितसंबंध असतात किंवा हितसंबंधांविषयी काही आडाखे असतात. त्या आडाख्यांच्या अनुरोधाने कृती करण्यासाठी संघटना उभी केली जाते आणि कार्यक्रमाच्या नियोजित दिशेला पूरक असा विचार, तत्त्वज्ञान आणि प्रत्येक संघटना तयार करते. व्हॉल्टेअरच्या विचाराने फ्रेंच राज्यक्रांती झाली नाही; फ्रेंच राज्यक्रांतीच्या विचाराला व्हॉल्टेअरने शब्द दिला. मार्क्स, एंगल्स्च्या विचाराने प्रेरित होऊन रशियन क्रांती उभी राहिली हेही तितकेच चूक आणि भारताचा स्वातंत्र्यलढा महात्मा गांधींच्या विचाराने उभा राहिला असे समजणे म्हणजे तर चूकच चूक. झारशाही कोसळत असताना पहिल्या महायुद्धात पराभूत झालेले रशियन सैन्य देशात परत येते याचा फायदा मध्यमवर्गीय उदारमतवादीही घेऊ शकत होते आणि लेनिनच्या नेतृत्वाखालील साम्यवादीही घेऊ शकत होते. प्रत्यक्षात लेनिनच्या नेतृत्वाखालील बोल्शेविकांनी बाजी मारली. भारतात इंग्रजांच्या आगमनानंतर भरभराटीस येणाऱ्या व्यापारी आणि कारखानदार वर्गाला पुरेपूर वाव मिळण्यासाठी स्वराज्याची गरज होती; पण त्यांनी उभ्या केलेल्या चळवळीला

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १५०