पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/155

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शेकाप मार्क्स, एंगल्स, लेनिन व स्टॅलिन यांचे ग्रंथ आधारभूत मानतो (दाभाडी). म्हणून या विचारवंतांच्या शेतीमालाच्या भावासंबंधीच्या भूमिकेचा थोडक्यात आढावा घेतला. मार्क्सवादी विचार भांडवलशाही व्यवस्थेप्रमाणेच औद्योगिकीकरणासाठी शेतकऱ्याचे शोषण आवश्यक आणि अपरिहार्य मानतो. शेतमालाचे भाव हे या शोषणाचे महत्त्वाचे साधन मानतो. शेकापने आपली मार्क्सप्रामाण्याधिष्ठित बैठक आणि शेतीमालाच्या भावाची मागणी यांचा समन्वय दाखवलेला नाही. ही मागणी मार्क्सवादी सिद्धांतात बसूच शकत नाही. शेतकऱ्यांवर रणगाडे पाठविण्याची तयारी होईपर्यंत लेनिन, बुखारिन व स्टॅलिन आदींनी 'शेतीमालाला योग्य भावा'ची गोड गोड भाषा वापरीत शेतकऱ्यांना झुलवले. त्याचप्रकारे देशांतील शेतकऱ्यांची प्रचंड बहुसंख्या लक्षात घेऊन, त्यांना काही काळ गुंतवून ठेवावे, शेतकऱ्यांना कामगार क्रांतीच्या चक्राला जखडून ठेवावे, अल्पसंख्य कामगारांचे क्रांतीतील नेतृत्व सिद्ध व्हावे यासाठी शेकापने शेतीमालाच्या भावाचा कार्यक्रम जाहीर केला.

 लहान, मोठ्या, छोट्या सर्व शेतकऱ्यांमध्ये या कार्यक्रमाला प्रचंड पाठिंबा आहे हे पक्षातील जमिनीवर पाय असणाऱ्या काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आले असावे. शेतकऱ्यांमध्ये पक्षप्रचार व्हावा व शेतकऱ्यांनी कामगार क्रांतीच्या गाड्यास जुंपून घ्यावे, या हेतूने शेकापने शेतीमालाच्या भावाचा कार्यक्रम जोडून घेतलेला आहे.

 या कार्यक्रमासाठी शेकापने आंदोलने केली; पण मर्यादित स्वरूपाची केली. इगतपुरीत भाताचे आंदोलन करून काहीही प्रभाव पडणार नाही, त्यासाठी प्रमुख भात उत्पादक राज्यांत शेतकऱ्यांची आंदोलक ताकद तयार झाली पाहिजे हे शेतकऱ्यांच्या धुरंधर नेत्यांच्या ध्यानात का आले नाही? राज्यापुरती ताकद मर्यादित असलेल्या शेकापला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारी कांदा व उसासारखी पिके आंदोलनासाठी घेण्याचे सुचले नाही? निव्वळ सामुदायिक शेती आणि जमिनीच्या राष्ट्रीयीकरणाचा कार्यक्रम घेऊन शेकाप ग्रामीण भागात उभाच राहू शकला नसता. साम्यवादी पक्षाचा अनुभव हेच दाखवितो. आदिवासी, गिरिजन यात काही काळ साम्यवादी पक्षांना स्थान मिळाले तरी शेतकऱ्यांत त्यांना कधीच उभे राहता आले नाही. शेकापची चतुराई ही, की पुस्तकी मार्क्सवाद्यांपेक्षा त्यांना ग्रामीण भागांतील अर्थिक सत्यस्थितीची जाणीव जास्त चांगली होती. या मागणीचे एवढे आकर्षण का, आर्थिक सिद्धांताच्या चौकटीत रास्त भावाचे स्थान काय याची फारशी स्पष्ट कल्पना नसतानाही व्यावहारिक पातळीवर शेकापने शेतीमालाच्या भावाचा प्रश्न हाती घेतला. मार्क्सवादी-कामगार-चळवळ घडवून आणण्यासाठी

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १४८