पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "ज्यावेळी युरोपियन लोक निव्वळ रानवट होते त्यावेळी आम्ही संस्कृतिसंपन्न होतो ही कल्पना म्हणजे आमच्या इतिहासकारांची फारच मोठी प्रेरक शक्तद्द. आमच्या देशाचा संपूर्ण धुव्वा उडवू पाहाणाऱ्या परकिय शत्रूंना तोंड देण्यासाठी सुसज्ज व्हावे म्हणून आम्ही आमचे पुरातन कील्ले, खंदक, सनदा, भूर्जपत्रे गतेतिहासाच्या गर्तेतून उकरून काढली." (श्री.अ.डांगे -आदिभारत,पृष्ठ ४.)

 "एका खोट्याचा प्रतिकार करण्यासाठी दुसरं खोटं सांगून काही सत्य समजू शकत नाही. इतिहासाचं सार काढताना मग अशा बांधिलकिच्या विचारवंतांची त्रेधातिरपीट उडू लागते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांना - 'सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृती निव्वळ अधम अशा इंग्रजी व्यवस्थेपुढे का नमली?' याचं उत्तर देण्यासाठी चक्रनेमिक्रमाने - रहाटगाडग्याप्रमाणे इतिहासात वर गेलेले खाली येतात, खाली आलेले यथाक्रम वर जातात त्यासाठी कोणत्याही प्रकारे भारतीय व्यवस्थेत ढवळाढवळ करण्याचं काही कारण नाही, असं खास पुणेरी निदान मांडावं लागलं.

 "एखाद्या पोलिसी चतुरकथेत खून कसा आणि कोणी केला असावा यासंबंधी अजागळ पोलिस अधिकाऱ्यानं आपली अटकळ मोठ्या आत्मविश्वासानं मांडली आणि त्याच्या अटकळीत अनेक गोष्टीचा खुलासा होत नाही असं लक्षात आलं म्हणजे ज्या प्रकारची रुखरुख लागते, त्या प्रकारची रुखरुख मला राष्ट्रवादी इतिहास वाचताना लागते. इतिहासाची साक्ष काहीतरी दडवण्यासाठी काढली जात आहे. काहीतरी लपवलं जात आहे, इतिहासात प्रत्यक्ष काहीतरी वेगळंच असलं पाहिजे असं वाटत राहावं.

 "आपला तो बबड्या आणि लोकाचं कारटं" या वृत्तीनं महाराष्ट्राच्या इतिहासात काही आत्मकौतुकाचा भाग यावा हे समजण्यासारखं आहे. पुण्याला पेशव्यांचा विश्रामबागवाडा पाहिला आणि त्याच्या दीडदोनशे वर्ष आधी दिल्लीश्वरांनी केलेले बांधकामं पाहिली म्हणजे सर्व देशाच्या इतिहासात पेशव्यांचं स्थान काय होतं याबद्दलची वर्णनं अवास्तव असावीत हे स्पष्टच होतं. छत्रसाल, बंदा बहादूर, सूरजमल जाट,हैदर, टिपू यांसारख्या इतर प्रदेशातील पुरुषांच्या कामाच्या संदर्भात मराठ्यांचा इतिहास लिहिला पाहिजे याची जाणीव होते. महाराष्ट्राचा इतिहास हा आत्मकौतुकानं भरला आहे आणि अवाजवीपणे आत्मकेंद्रीही आहे.

 आपलं विशिष्ट ऐतिहासिक तत्त्वज्ञान लक्षात घेऊन त्याच्या अनुरोधानं गतकाळ तपासून बघण्याचा कार्यक्रम काही मार्क्सवादी लेखकांनीही पार पाडला आहे. डांगे, राजवाडे, जयस्वाल, देवीप्रसाद चट्टोपाध्याय, शरद पाटील यांनी आदिभारत काळातील अर्थव्यवस्थेचा विकास, हा मार्क्सच्या अनुमानाप्रमाणेच झाला असं

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १२