पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रामुख्याने या थरासमोर असतात. (शेगाव)

 याच ठरावांत गरीब व मध्यमवर्ग शेतकरी यांचे वर्णन :

 जमिनीची अशाश्वती, जमिनीची अपुरी साधने, शेतीमालाच्या अस्थिर व अयोग्य किमती, अपुरे भांडवल, वाढता खर्च अशा या घातचक्रांत हा थर सापडला आहे असे केले आहे.

 शेतीव्यवसाय किफायतशीर करण्याचे त्राण राहिले नसल्यमुळे दिवसेंदिवस या थराचे जीवन हलाखीचे होत चालले आहे.

 'श्रीमंत' शेतकऱ्यांची श्रीमंती ही शेतकीची नसून पुढारीपणाची आहे याची जाणीव अनेक ठरावात स्पष्ट दिसते.

 समाजविकास योजनेद्वारे अंमलात येणाऱ्या कार्यक्रमांचा फायदा ग्रामीण विभागातील सुखवस्तू विभाग म्हणजे श्रीमंत शेतकरी उपटीत आहे.(नाशिक)

 शेतीक्षेत्रात सरकारने केलेल्या भांडवल गुंतवणुकीचा फायदा बड्या जमीनदारांनी व बागायतदारांनी उचलला आहे. (सांगली)

 मोठ्या जमीनमालकांनी आणि राज्यकर्त्यांच्या दोस्तांनी या योजनांचा फायदा करून घेतला... याच मंडळीतून सहकारी संस्था, सहकारी कारखाने, सहकारी व्यापारी संस्था व स्थानिक पातळीवरील सत्ताधारी पक्षांत भरणा झालेला दिसतो. सामान्य ग्रामीण जनतेला भांडवलदारी राजकारणात व कारस्थानांत अडकवून ठेवण्यासाठी यांचाच हस्तक म्हणून उपयोग केला जातो. (अलिबाग)

 भांडवली शेती करणाऱ्यांनाही किमतीचा प्रश्न भेडसावत आहे. फक्त पुढारी- शेतकरी शेतीमालाच्या भावाच्या प्रश्नांतून सुटका करून घेतात, घेऊ शकतात हे एकदा मानले, की छोट्यामोठ्या शेतकऱ्यांच्या वादात शेकापने स्वत:ला इतके का गुरफटून घेतले याचे आश्चर्य वाटते. शेती हे नफ्याचे साधन नसून, तोट्याचे साधन आहे हे स्पष्ट झाले, की शेतीचा आकार जितका मोठा तितका तोटा अधिक; उलाढाल मोठी, कर्जे मोठी; पण तोटा अधिक हे उघडच होते.

 शेतकऱ्याचे व शेतमजुरांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या उत्पन्नात वाढ होणे जरूर आहे व त्यासाठी शेतीमालाच्या किफायतशीर किमतीचा प्रश्न सुटला पाहिजे. (पोयनाड)

 शेतकरी शेतमजुरांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी, आवश्यक ती भांडवलनिर्मिती व भांडवल गुंतवणूक करण्यासाठी शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी देण्यात आली पाहिजे. (सांगली)

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १३६