पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाणाऱ्या राज्यकर्त्या पुरोहित किंवा व्यापारी समाजातील होते. शेतकऱ्यांच्या शोषणाचा ऊहापोह करणे त्यांना सोयीस्कर नव्हते.

 ज्या देशात ऐतिहासिक दस्तऐवज व्यवस्थित लिहिले जातात, ठेवले जातात, सांभाळले जातात-त्या देशांतसुद्धा केवळ कागदपत्रांवरून इतिहासात नेमक काय घडलं हे सांगण कठीण होतं. भारतासारख्या देशात, जिथे लेखी नोंदी क्वचितच ठेवल्या जातात-ठेवल्या तर सत्याच्या आग्रहापेक्षा स्वत:ची किंवा धन्याची भलावण करण्याच्या बुद्धीनं -दप्तरं सांभाळली जात नाहीत. अगदी शिवरायाचे दस्तुरखुद्द कागदपत्र -पहारेकरी हिवाळ्यात क्षणभराच्या उबेसाठी शेकोटीला वापरतात; तिथे तर कागदपत्रांवरून इतिहास समजणं आणखीच दुरापास्त! लढाया, लुटालुटी, जाळपोळ यातून अपघातानं बचावलेले कागद आणखी एका अपघातानं नजरेखाली घालायला मिळाले,तर त्या आधारावर इतिहास उभा करणं धार्ष्ट्याचंच होईल.

 महाराष्ट्राचा इतिहास तर अभिनिवेशानंच जास्त भरलेला आहे. पाश्चिमात्य इतिहासकारांनी साम्राज्यशाही राजवटीला आधार देणारा इतिहास मांडला.त्या नेटिव्ह राजेरजवाडे, सरदार, दरकदार यांचं अज्ञान, भेकडपणा, कर्तृत्वशून्यता, आळस, स्वार्थलंपटपणा, देशभक्तीचा अभाव यावर भर दिला. यावर प्रतिक्रिया म्हणून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात भारतीय अस्मितेचं, राष्ट्रीयत्वाचं संरक्षण करण्याच्या बुद्धीनं अनेक इतिहासकार लेखणी सरसावून निघाले "या दोन्ही पद्धतींमध्ये सत्यसंशोधनाला आवश्यक असणाऱ्या अलिप्त आणि तटस्थ संशोधक दृष्टीला मर्यादा पडल्या. निर्भय वास्तववाद कित्येकदा गमावला गेला आहे." (लक्ष्मणशास्त्री जोशी, पुरस्कार, 'दासशूद्रांची गुलामगिरी-' लेखक : शरद पाटील.)

 "आम्ही प्राचीन आहोत. एवढंच नव्हे तर आज जगात शास्त्र, तत्त्वज्ञान, राजकारण वगैरे ज्या ज्या म्हणून काही गोष्टी आहेत-त्या सर्व एके काळी आमच्याजवळ होत्या व आम्हाला ठाऊक होत्या; हे सिद्ध करण्याचे भारतीय लेखकांना व इतिहासकारांना एक प्रकारचे वेडच लागले होते. तुम्ही म्हणता कांट हा महान तत्त्वज्ञानी होता काय? तर मग आमचा शंकराचार्य त्याहूनही महान होता. वाङ्मयात शेक्सपीअर श्रेष्ठ म्हणता तर आमचा कालिदास त्याच्यापेक्षा माठा साहित्यिक होता. तुमच्याकडे राजकारणात रुसोचा सामाजिक कराराचा सिद्धान्त निघाला ना ! तसा आमच्याकडेही होता. आमच्याकडे विमाने, रेल्वे, स्फोटक द्रव्ये सर्व काही होते. विशेष म्हणजे ज्यावेळी युरोपखंडातले लोक अस्वलाची कातडी परिधान करण्याच्या रानटी अवस्थेत होते. त्यावेळी आम्ही तलमदार कापड वापरीत होतो."

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ११