मार्क्स, एंजल्स, लेनिन, स्टॅलिन यांचे ग्रंथ आधारभूत मानून, तिसरी इंटरनॅशनल व कॉमिनफॉर्म या जागतिक कम्युनिस्ट चळवळीचे सिद्धांत आणि मार्गदर्शन आत्मसात करून... (दाभाडी)
पक्ष मार्क्सवादी-लेनिनवादी बनला. एका बाजूला कम्युनिस्ट पक्षाचे 'राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याचा विचका करणारे ट्रॉटस्कीवादी अत्यंत जहाल व पंथप्रवृत्तीचे धोरण' आणि दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्षाचे 'गांधी छाप' पुढारीपणाचे आणि सिद्धांताचे क्रांतिविरोधी धोरण या दोन विरोधी प्रवृत्तींशी झगडा करण्यासाठी स्वतंत्र पक्ष उभा करावा लागला.
प्रत्यक्ष व्यवहारात सोव्हिएट रशियाला जागतिक शांततेचा आणि लोकशाही प्रवृत्तीचा मानण्यात आले आहे. सोव्हिएट पक्षाकडून शेकापला मान्यता मिळावी म्हणून काही प्रयत्न झाल्याचीही नोंद आहे. ज्याचे कुंकू लावून मिरवायचे त्यानेच धनी म्हणवून घ्यायला नकार द्यावा, अशी ही मोठी विचित्र परिस्थिती; तरीही एकामागून एक प्रत्येक अधिवेशनातील ठरावात रशियन क्रांतिप्रवणतेच्या आणि लोकशाही नेतृत्वाच्या (!) उदोउदोचा रतीब न चुकता घालण्यात आला आहे.
अमेरिका- या विश्वभरातील यच्चयावत युद्धखोरीचा, आर्थिक शोषणाचा आणि अधमतेचा खलनायक हे ओघाने आलेच; पण नव्याने स्वतंत्र झालेल्या तिसऱ्या जगातील नेत्यांची भूमिका काय? आपल्या देशाबद्दल बोलायचे झाले तर भारतीय स्वातंत्र्यलढा हा खरीखुरी जनता क्रांती टळेल अशा पद्धतीने काँग्रेसच्या भांडवलदारी पुढारीपणाने लढवला.
१९४७ पूर्वीच्या आणि आजच्या परिस्थिती फरक एवढाच की साम्राज्यशाहीविरोधी हिंदी स्वातंत्र्यलढ्याचा घात करून हिंदी भांडवलदारवर्गाने साम्राज्यवाद्यांशी हातमिळवणी करून जनतेच्या पिळवणुकीवर शासनयंत्र आपले स्वत:च्या हातात घेतले.
हिंदूस्थान व ब्रिटन यांच्या आर्थिकसंबंधात मुलभूत फरक झालेला नाही. हिंदूस्थानची अर्थव्यवस्था अजूनही वसाहतिक स्वरूपाचीच आहे. (दाभाडी)
परराष्ट्रीय आघाडीवर मात्र भारतीय जनतेच्या व आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या दबावामुळे भारत सरकारला साम्राज्यवादविरोधी धोरण आखणे भाग पडले (शेगाव). भारत सोडल्यास इतर तिसऱ्या जगातील राष्ट्रांची परिस्थिती कशी काय?
आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील नवोदित स्वतंत्र राष्ट्र साम्राज्यशाहीविरोधी व शांततावादी धोरणाचा पुरस्कार करीत आहेत. (नाशिक)
आपले स्वातंत्र्य टिकवणे व आर्थिक विकास घडवून आणणे हे दोन प्रश्न त्यांना