पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/120

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ४.अनुत्पादक शेती

 शेतजमिनी पाळीपाळीने पडीक ठेवता येत नाहीत, त्यामुळे त्या नापीक झाल्या आहेत. (पान २०५) गोवधामुळे मजबूत बैलांचे बेणे कमी कमी होत गेले. गायरानांच्या कमताईमुळे पोटभर चारावैरण मिळेनाशी होऊन जनावरांचा ऱ्हास होत चालला. जिराईत शेते पिकामागून पीक देऊन थकली. जमिनीची धूप होऊन लक्षावधी खंडी खतांचे सत्त्व समुद्रात वाया दवडले जाते (पान २४७) पिकांचा डुकरे येऊन नाश करतात (पान २४९) पेशवाईत शेतीउपयोगी कामे अजिबात झाली नाहीत. अशा अनेक शेतीच्या समस्यांची नोंद जोतीबांनी केली आहे.

 ५. सरकारी करवसुली

 इंग्रजांनी प्रथम रोख महसूल आणि कर शेतकऱ्यांवर लादला. धान्याच्या स्वरूपात सरकारला कर देणे हे शेतकऱ्यांना प्रचंड संकट नसे. रोख रक्कम द्यावी लागणे म्हणजे बाजारात जावे लागणे. पुरेशी रक्कम क्वचितच उभी करता येत नसली, की सावकाराच्या घरी जाणे आलेच.

 सरकारी जमीन पट्टी दर तीन वर्षांनी पैमाष करिताना वाढवली जाई. जंगले गायराने यांच्या वापराकरिता रोख पैसे मोजावे लागू लागले. (पान २०६) शिक्षणासाठी लोकल फंड लादला. (पान २२७) माल बाजारांत नेऊन दान करावयास जाण्याच्या मार्गात दर सहा मैलांवर जागोजाग जकाती, अगदी मिठावरसुद्धा भली मोठी जकात बसवली. कालव्यांतील पाण्याची किंमत अज्ञानी शेतकऱ्यांपासून मन मानेल तशी घेऊन पाण्याची मात्र योग्य तजवीज नाही (पान २२८) अशा करांतून आपल्या देशबांधव युरोपांतील इंजिनीयर कामगारांस मोठमोठे पगार देण्याच्या' आणि 'युरोपांतील सावकारांस महामूर व्याज देण्याचा' हेतू असे.

 इंग्रजांच्या वसाहतवादी धोरणाची जोतीबांना स्पष्ट कल्पना होती. शेतकऱ्यांचा कच्चा माल लुटीच्या भावाने विकत घेण्याची व्यवस्था पूर्वीच्या राजवटीत तयार झालेली होती. त्याचा फायदा आता इंग्रजही विनासायास घेऊ लागले. आपला कारखानदारी माल येथे आणून खपवू लागले. प्रचंड करभार लादून लूट राजरोस केली.

 ६. सरकारी उधळपट्टी

 आणि अशा लुटीचा उपयोग जनकल्याणासाठी करण्याचे ऐवजी केवळ कामगारांचे पगार, ऐषाराम, विलायती देणी यासाठी केला जाऊ लागला. युरोपीय कामगारांचीच नव्हे,नेटीव ब्राह्मण कामगारांचीही भरभक्कम पगारांमुळे चंगळ चालू झाली. त्यांच्या राहणीमानाची सुरेख वर्णने जोतीबांनी जागोजाग केली आहेत.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ११५