पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सात


 भटशाहीचे साथीदार
 जोतीबांना इंग्रजांच्या धोरणाचा भारतीय शेतीवर व शेतकऱ्यावर होणारा भयानक परिणाम चांगला माहीत होता. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेच्या आर्थिक कारणांचीही त्यांनी मीमांसा केली आहे.



 १. जंगलखात्याचे धोरण : 'पूर्वी ज्या शेतकऱ्याजवळ फारच थोडी शेते असत व ज्याचा आपल्या शेतीवर निर्वाह होत असे, ते आसपासचे डोंगरावरील दऱ्याखोऱ्यांतील जंगलांतून उंबर, जांभूळ वगैरे झाडांची फळे खाऊन, पळस, मोहा इत्यादी झाडांची फुले, पाने आणि जंगलांतून तोडून आणलेल्या लाकूडफाट्या विकून, पट्टीपासोडीपुरता पैसा जमा करीत व गांवचे गायरानाचे भिस्तीवर आपल्याजवळ एक दोन गाया व दोन चार शेरड्या पाळून, त्यांच्यावर जेमतेम गुजारा करून मोठ्या आनंदाने आपापल्या गावीच राहत असत.' (पान. २०४)

 सामाजिक मालकीची जंगले वगैरे सरकारी झाल्यामुळे गरीब शेतकऱ्यांना तोही आसरा राहिलेला नाही.

 २. ग्रामोद्योगांचा नाश

 इंग्लंडातील कारागीर लोकांनी तयार केलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या नित्योपयोगी वस्तू आयात केल्यामुळे देशी कारागिरांची दैना उडाली आहे. यासंबंधीचे जोतीबांचे विवेचन आपण पहिल्या प्रकरणातच पाहिले आहे.

 ३. अपुरी शेती

  'सर्व हिंदूस्थानात हमेशा लढाया धुमाळ्यांत मनुष्यप्राण्यांचा वध होण्याचे बंद पडल्यामुळे चहुकडे शांतता झाली खरी, परंतु या देशात स्वाऱ्या, शिकारी बंद पडल्यामुळे शौर्य व जहामर्दी लयास जाऊन राजेरजवाडे 'भागू बाया' सारखे दिवसा सोवळे नेसून देवपूजा करण्याचे नादांत गुंग होऊन रात्री निरर्थक उत्पत्ती वाढविण्याचे छंदांत लंपट झाल्यामुळे येथील चघळ खानेसुमारी मात्र वाढली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भाऊहिस्से इतके वाढले, की कित्येकांस आठआठ दहादहा पाभरीचे पेऱ्यावर गुजारा करावा लागतो.' (पान २०३-२०४)

 लोकसंख्येच्या प्रश्नाचे हे विश्लेषण आजच्या दृष्टीने प्राथमिक वाटले तरी त्या काळात फारसे अनुचित नव्हते.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ११४