पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/118

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राजकीय स्वातंत्र्य मिळाले तर ते एकमेकांवर आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय गुलामगिरी लादू पाहतील हे जोतीबांनी अचूक हेरले होते.

 यासाठी वेगवेगळ्या जातीजमातींना एकत्र करून खरेखुरे एकमय लोक तयार करावेत इंग्रजी राज्याच्या आसऱ्याचा त्याकरिता उपयोग करून घ्यावा अशा मताचे होते. अंतर्गत शोषण असेल तर ते राष्ट्रच नव्हे. कोणाही व्यक्तीविषयी वा जातीविषयी आकस ठेवण्याइतके जोतीबा क्षुद्र मनाचे नव्हते. ब्राह्मण विधवांकरिता त्यांनी केलेले काम आपण पाहिलेच आहे.

  'पाश्चात्त्य विचार व सांस्कृतिक यांचा परिणाम ब्राह्मणांच्या मनावर होत होता. पेशव्यांच्या राज्यांत जितके ते धर्मांध अन् कर्मठ अन् असहिष्णू होते तितके ते आता राहिले नव्हते.'

  'ब्राह्मण हे बंधू आहेत; परंतु त्याच्या दुष्कृत्यामुळे त्यांना बंधू म्हणावयास आपल्याला लाज वाटते. जरी त्यांनी पूर्वी शूद्रांचा छळ केला आहे तरी त्यांना आपण बंधू म्हणून मानावयास तयार आहोत. मात्र त्यांनी आजपासून वर्तनातील स्वार्थी हेतू टाकून दिला पाहिजे.'

  'भूतकाळातील आपल्या स्वार्थसाधू वृत्तीविषयी पश्चात्ताप करावयास ब्राह्मण तयार आहेत काय?'

  परंतु आमची पूर्ण खात्री आहे, की आपल्या उच्च स्वयंसिद्ध पदावरून ब्राह्मण हा खाली उतरून कुणब्यांशी आणि कनिष्ठ वर्गांतील लोकांशी बंधुत्वाच्या समान भूमिकेवरून, आम्ही त्याच्याशी झगडा केल्याशिवाय कधीही अपसूक येणार नाही.' (धनंजय कीर, पृष्ठ क्र १३३, १३५)

 ब्राह्मणावर टीका करताना शूद्रादि वर्गावर कोरडे ओढायलाही त्यांनी कमी केले नाही. देशांतर्गत संघर्ष उभा करण्याची जोतीबा फुल्यांची भूमिका अशी होती.

 तुर्कस्थानातील राज्यक्रांतीनंतर केमाल पाशाने गोंड्याच्या तुर्की फेज टोपीवर बंदी घातली. अनेकांनी विचारले गोंड्याच्या टोपीत आक्षेपार्ह, निषेधार्ह काय आहे? केमाल पाशाने उत्तर दिले, 'टोपीत काहीच दोष नाही. काळी काळानंतर मीच कदाचित ही टोपी वापरा म्हणून लोकांना आग्रह करेन, पण आज ती टोपी सर्व प्रतिगामी, बुरसटलेल्या विचारसरणीच प्रतिक आहे; म्हणून तिला आज बंदी घातली पाहिजे.'

 जोतीबांनी 'पगडी'ला विरोध केला ते पगडी म्हणजे शोषण अशा गैरसमजाने नाही. हे शोषण फेट्याकडून होते, हॅटमधून होते. खादी टोपीतून होते आणि बोडक्यानेही होऊ शकते. जोतीबांच्या काळी ते पगडीतून होत होते म्हणून तिला विरोध.


शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ११३