'परकी सुराज्य हे स्वराज्याची बरोबरी करू शकणार नाही, त्याला त्याची सर येणार नाही ह्या तत्त्वावर जोतीरावांचा विश्वास नव्हता असे म्हणणे योग्य होणार नाही. त्याचा अर्थ एवढाच करावयाचा, की त्यांच्या मते सामाजिक प्रगतीला नि क्रांतीला प्रतिकूल ठरलेल्या ब्राह्मणी राज्यापेक्षा इंग्रज राज्य परवडले. नानासाहेब पेशवे यशस्वी झाले असते तर ब्राह्मणाचे जातिश्रेष्ठत्व मानणारे, अन्यायी नि प्रतिगामी ब्राह्मणी राज्य पुन्हा महाराष्ट्रांत आले असते अशी त्यांना भीती वाटत होती.' (धनंजर कीर, पृष्ठ क्र. ९१)
इंग्रजी राज्य हे परमेश्वराचे या देशास अतर्क्य वरदान आहे असे स्पष्टपणे बजावणाऱ्या नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांपेक्षा त्यांची भूमिका वेगळी नव्हती. मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिकेत इंग्रजांच्या स्वामी निष्ठेचीच भूमिका घेत होते.
जोतीबांचा विचार अधिक स्पष्ट होता : 'आर्यांच्या खोडसाळ मतलबी धर्मांवरून धूर्त आर्यभट ब्राह्मण अज्ञानी शूद्रास तुच्छ मानिनात. अज्ञानी शूद्र, अज्ञानी म्हारांस नीच मानितात. त्यातून अतिसोवळे पूर्व आर्यभट ब्राह्मण शूद्रादि-अतिशूद्रांस नीच मानून आपण तर नाहीच; परंतु त्या सर्वांमध्ये आपापसात रोटी व्यवहार व बेटी व्यवहार होऊ देण्याविषयी प्रतिबंध केल्यामुळे अर्थातच त्या सर्वांमधले भिन्नभिन्न प्रकारचे आचारविचार, खाणेपिणे, रीतिभाती,एकमेकांच्या एकमेकांशी मिळत नाहीत. अशा अठरा धान्यांची डाळी होऊन त्याचे चरचरीत कोडबुळे म्हणजे एकमय लोक 'nation' कसे होऊ शकेल? (सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, पृष्ठ क्र. ४६०)
जोतीबांची राष्ट्र ही संकल्पना विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्यापेक्षा वेगळी आहे. राष्ट्र म्हणजे भौगोलिक प्रदेश, वेगवेगळी स्थळे, भाषा, परंपरा, जुन्या रूढी आणि प्रसिद्ध व्यक्तींचा इतिहास नव्हे. राष्ट्र म्हणजे सामाजिक, राजकीय, आर्थिकदृष्ट्या एकमय झालेले लोक. न्यायमूर्ति रानड्यांच्या शब्दांत :
'तुमच्या राजकीय हक्काच्याबाबतीत जर तुमची अधोगती झालेली असेल तर तुमची समाजपद्धती चांगली असणे शक्य नाही. तुमची समाजपद्धती विवेक व न्याय ह्यांवर अधिष्ठित नसेल तर तुम्ही राजकीय अधिकार व वैयक्तिक हक्क यांचा उपभोग घेण्यास लायक ठरणार नाही. तुमची समाजव्यवस्था चांगली असल्याखेरीज तुमची धर्मविषयक ध्येये जर हीन व निकृष्ट असतील तर सामाजिक-आर्थिक किंवा राजकीय क्षेत्रात तुम्हाला यश मिळणे शक्य नाही. हे परस्परावलंबन योगायोगाने आले नसून हा निसर्गनियम आहे.'
आर्थिक, सामाजिक, धार्मिकदृष्ट्या विभिन्न असलेल्या जनसमुदायांना केवळ