संभावना 'पायलीचे पंधरा आणि अधोलीचे सोळा' ब्राह्मणग्रंथकार म्हणून केली. शूद्राच्या गळ्यातील दास्यत्वाच्या पट्ट्याला ज्यांनी बोटसुद्धा लावले नाही, त्यांच्या पोकळ पांडित्याची किंमत जोतीबांच्या हिशेबी शून्य होती.
ब्राह्मणांच्या ग्रंथांनी आजपर्यंत सांगितलेला इतिहास जोतीबांनी उलटविला. शूद्रांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची एक नवी मांडणी केली. या मांडणीला असलेला पुराव्यांचा आधार पक्का नसेल; पण भटांच्या धर्मग्रंथाइतक्या निराधार खल्लड ग्रंथांना उधळून लावण्यासाठी बारकाव्याने साधनांची मांडणी करणे म्हणजे त्या ग्रंथांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देणे झाले असते. शेतकऱ्यांच्या इतिहासाची मांडणी करताना 'बळीराजा'ला जोतीबांनी अक्षरश: पुन्हा जीवन दिले. शेतकऱ्यांना एक अभिमानाचे स्थान मिळवून दिले.
हिंदूधर्माच्या तुलनेने एक निर्मिक व मनुष्यप्राणिमात्रांत समानता मानणाऱ्या ख्रिस्ती धर्माचे तर जोतीबांनी भरभरून कौतुक केलेच; पण हिंदू मनाला झोंबणारी गोष्ट म्हणजे त्यांनी महम्मद आणि त्याच्या समतारूपी धर्माचेही कौतुक केले. अफझलखानासमवेत असलेल्या सय्यद बंडाची बाजीप्रभू देशपांडेच्या व मुरारबाजीच्या बरोबरीने वाहवा केली.
आर्यदस्यु इस्लामने मुक्त केले । ईशाकडे नेले । सर्व काळ ॥
आर्यधर्म-भंड इस्लामे फोडिले । ताटात घेतले । भेद नाही ॥
अशीही घोषणा केली.
भटब्राह्मणांकडून लूट
सम्यक् धर्मव्यवस्थेविरुद्ध बंड उभारण्याचे कारण ब्राह्मणांचे सर्वंकष लुटालुटीचे धोरण. शूद्रांना विद्याबंदी करून, त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना वेळोवेळी भट कसे फसवीत, लुबाडीत याचे महिनावार, सणवार, प्रसंगवार, जन्मापासून दशयपिंडांपर्यंत तपशीलवार वर्णन शेतकऱ्यांच्या असूडाच्या पहिल्या प्रकरणात केले आहे. या धार्मिक लुटीचे प्रमाण किती होते? ब्राह्मण दक्षिणेच्या निमित्ताने काय इतका पैसा उधळीत होते, की ज्यामुळे शेतीतील गुणाकार आटून जावा?
११ जुलै १९८४ च्या नेटिव्ह ओपिनियन' या नियतकालिकाचा बातमीदार म्हणतो:
'खेड्यांतील भटांचा वार्षिक सरासरी फायदा वीस रुपयांपेक्षा क्वचितच जास्त असतो, ही गोष्ट लक्षात घेता शेतकऱ्यांच्या भयंकर दारिद्रयाचे कारण आपण दुसरीकडेच शोधले पाहिजे... शेतकऱ्यांच्या दारिद्रयाची जबाबदारी इंग्रज