पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वतंत्र तख्त स्थापन केले आणि त्यांचा अकस्मात मृत्यू ओढवला तेव्हा मराठी फौजफाटा घेऊन दक्षिणेत उतरून यावे लागले.

 इतिहासाचा अपर्थ

 बळिराजापेक्षा शिवाजी राजा जिवंतपणी सुदैवी ठरला.पण मृत्यूनंतर शिवाजीराजाचीही अवस्था बळिराजाप्रमाणेच होऊ लागली आहे. स्वराज्यसंस्थापनेची कल्पना नांगरासह तलवार हाती घेणाऱ्या मावळ्यांच्या आणि सर्वसामान्य रयतेच्या सहकार्याने मूर्त झाली. भारतातील त्या काळात घडणाऱ्या इतर इतिहासाकडे पाहिले म्हणजे भयाण काळोख्या रात्री वादळी हवेत एखादा लहानसा दिवा तेवत असावा असे या स्वराज्याचे स्वरूप दिसते.ही पणती त्या परिस्थतीत तेवत राहणे दुरापास्तच नव्हे अशक्यच होते. संभाजी एक अविवेकि म्हणून सोडून द्या, पण राजारामासारख्या संयत पुरुषाससुद्धा स्वराज्य आणि शेतकरी यांच्यामध्ये वतनदारांचे मध्यस्थ घ्यावे लागले. त्यानंतर मराठेशाहीचे स्वराज्य आणि देशभरातील इतर पाळेगार आणि पुंड यांत जवळ जवळ काहीच फरक राहिला नाही. बंगलमध्ये मोगलांच्या इतक्या स्वाऱ्या झाल्या पण बंगालातील बायकापोरांना दहशत बसली ती भोसल्यांच्या लुटीची! पानिपतच्या लढाईच्या वेळी आसपासच्या शेतकऱ्यांना सदाशिवराव भाऊच्या सैन्याबद्दल आपुलकि वाटण्याचे काहीच कारण नव्हते. खुशवंतसिंग लिहितात, "पंजाबातील लोकांना मराठ्यांकडून लूट होणे अधिक भयानक वाटे. कारण मराठे रयतेच्या अंगावरील कापडचोपडसुद्धा काढून नेत." स्वराज्याचा शिवाजी महाराजांनी लावलेला दिवा त्यांच्याबरोबरच विझला. शिवाजीचे वारसदार आणि पेशवे यांच्यात स्वराज्याचे तेज नावापुरतेसुद्धा शिल्लक नव्हते.

 मग शिल्लक राहिल्या त्या फक्त शाहिरांच्या अतिशयोक्त आणि अघळपघळ कहाण्या. शिवाजीला मिळालेली मान्यता वापरून घेण्याचा प्रयत्न करणारे हरघडी निघाले. कोणी छत्रपतीला गोब्राह्मण प्रतिपालक असे बळचे बनविले. कोणी त्याचा उपयोग जातीयवाद वाढविण्याकरिता केला आणि हिंदुत्ववाद्यांनी तर शिवाजीवर जवळ जवळ मक्तेदारीचा कब्जा मिळविला.त्यांनी इतिहासाची मांडणी केली ती अगदी साधी आणि सोपी, पण तितकिच खोटी आणि विखारी.त्यांनी इतिहासाचे कुभांड रचले ते थोडक्यात असे.

 शिवाजीच्या काळी सर्व महाराष्ट्र मोगलांनी ग्रासून टाकला होता. ते गावेच्या गावे लुटीत असत, देवळे पाडीत, देवांच्या मूर्ती फोडीत माणसांची कत्तल करीत, त्यांचे हालहाल करीत, स्त्रिया-मुलांचा छळ करीत, त्यांना गुलाम बनवीत किंवा जनानखान्यात दाखल करीत. हिंदूंना पूज्य असलेल्या गोमातेची भरदिवसा कत्तल होत असे. अशा

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ८