थोड्या काळानंतर समाजसुधारणेला राजकारणापेक्षा प्राधान्य द्यावे यासाठी गोपाळराव आगरकरांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका जोतीबांनी समाज- अर्थकारणाला प्राधान्य देणयाविषयी आग्रह धरून मांडली. टिळक व आगरकर दोघेही ब्राह्मण. महाराष्ट्रभर गाजलेला त्यांचा वाद समाजकारण आणि राजकारण यांमधला. सुखवस्तू समाजाच्या या धुरीणांना अर्थकारणाच्या महत्त्वाची जाणीव पुसटच. जोतीबा याबाबत आजच्या कोणत्याही विचावंताइतकेच आधुनिक होते. जातिव्यवस्था,ब्राह्मणेतरांना विद्याबंदी, स्त्रियांची गुलामगिरी हे अन्याय अपघाताने होत नाहीत. जाणीवपूर्वक, समजूनउमजून आर्थिक शोषणाच्या षड्यंत्राचे हे भाग कुशलतेने एकत्र केलेले आहेत हे त्यांनी बरोबर ओळखले आणि पहिला हल्ला चढविला तो धर्मव्यवस्थेवर आणि त्याचे प्रणेते आर्यब्राह्मण यांजवर. शेतकऱ्यांच्या शोषणाकरिता इंग्रजांना वेगळी यंत्रणा उभारावी लागलीच नाही. ब्राह्मणांनी प्रस्थापित केलेल्या व्यवस्थेचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारले. त्यांचा वेगळा हिस्सा चालू झाला. शेतकऱ्यांची हलाखी वाढत चालली. शहरांच्या माध्यमांतून इंग्रजांनी खेड्यांचे शोषण केले ही कल्पना महात्मा गांधींनीही पुढे स्पष्ट केली. जोतीबांच्या काळी शेतकऱ्यांच्या दृष्टीने भटशाही हाच मोठा चोर होता. इंग्रज त्या मानाने सोसवणारा चोर. छोट्या चोराच्या आधाराने मोठ्या चोराला उलथवण्याची चतुर रणनीती जोतीबांनी स्वीकारली आणि परंपरागत हिंदूधर्माच्या सर्व अंगांवर कोणाच्या रागालोभाची पर्वा न करता तुफान हल्ला चढवला.
□
चार
वेपुराणांची भंबेरी
हिंदूधर्मव्यवस्थेविरुद्ध जोतीबांनी आघाडी उघडली. ती नाजूक तीर मारीत नाही. धर्मग्रंथात अस्पृश्यतेला, स्त्रियांच्या दास्यत्वाला आधार नाही... असले पंडिती युक्तिवाद करण्याचा त्यांनी प्रयत्नही केला नाही. वेदोपनिषद, पुराणे, महाभारतासाहित समग्र धर्मव्यवस्थेवर त्यांनी तोफांचा भडिमार सुरू केला. विष्णूच्या दशावतारांची दशा दशा करून टाकली. मासे, कासव, डुक्कर, सिंह, वानर या आकाराच्या देवांची भंबेरी उडवली. 'चार तोंडाचा ब्रह्मा', 'दहातोंड्या रावण' यांच्या भाकडकथा, वेदोपनिषदांची लुच्चेगिरी यांना फरा ओढत बाहेर काढले. मुकुंदराज, ज्ञानेश्वर, रामदासांसारख्या ब्राह्मणांतही मानल्या जणाऱ्या संतांची