पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  'युरोपियन व ब्राह्मण कामगारांस मोठमोठ्या पगाराच्या जागा व पेन्शने देण्यापुरते महामूर द्रव्य असावे याहेतूने, कोरड्या ओल्या कोंड्याभोंड्याच्या भाकरी खाणाऱ्या, रात्रंदिवस शेतीत खपणाऱ्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या शेतावर दर तीस वर्षांनी पाहिजेल तसे शेतसारे वाढवले.' (पृष्ठ क्र. २२७)

 साऱ्याशिवाय जकाती वाढवल्या, जंगले घशात टाकली, 'कालव्याच्या पाण्याची किंमत अज्ञानी शेतकऱ्यांपासून मनमानेल तशी' घेतली. (पृष्ठ क्र. २२८)शासनाच्या या धोरणाचा परिणाम असा झाला, की

  'कधी कधी शेतकऱ्याने गाडीभर माळवे शहरात विकण्याकरितां आणल्यास त्या सर्व मालाची किंमत बाजारात जास्ती कमी वजनाने घेणारे-देणारे दगेबाज दलालांचे व म्युनिसिपालिटीचे जकातीचे भरीस घालून गाडीभाडे अंगावर भरून, त्यास घरी जाऊन मुलाबाळांपुढे शिमगा करावा लागतो.' (पृष्ठ क्र. २२९)

  'सारांश या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांनी लागवडीकडे केलेला खर्चसुद्धा उभा राहणेची मारामार पडते.' (पृष्ठ क्र. २३०)

 दोन

 'शेतकऱ्याचा असूड'चे चौथे प्रकरण प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्यक्षात वाचलेच पाहिजे इतके सुंदर उतरले आहे. 'शेतकऱ्यांसहित शेतकीची हल्लीची स्थिती' या प्रकरणांत एका शेतकऱ्याच्या गृहस्थितीचे इतके सरस यथार्थ चित्रण आहे, की जोतीबा केवळ दूरदृष्टीचे तत्त्वज्ञानी आणि समाजसुधारक होते, एवढेच नव्हे तर प्रभावी लेखणीचे लेखकही होते हे लक्षात येते. मराठी भाषा किती परिणामकारक रीतीने वापरता येते, तिची शब्दसंपत्ती किती अथांग आहे याची जाणीव वाचकाला होतेच; पण यापलीकडे जोतीबांच्या सर्व लिखाणाची, कार्याची, जीवनाची खरी प्रेरणा आणि तळमळ यांचे उगमस्थान लक्षात येते.

 माझ्या गावातील पाचपंचवीस शेतकऱ्यांना मी हे प्रकरण वाचून दाखविले. आयाबहिणीसुद्धा सहज ऐकायला येऊन बसल्या. लहान पोरे-पोरीसुद्धा आल्या. सगळे प्रकरण वाचून होईपर्यंत कोणी हालले नाही का बोलले नाही. त्यांच्या दररोजच्या वापरातले शब्द पुस्तकात लिहिले गेलेले त्यांनी ऐकलेच नव्हते. पुस्तकांत म्हणजे भटाळलेलीच भाषा असावयाची अशी अनुभवाने खात्री झालेली. हे काय नवल ऐकतो आहे अशा अचंब्याने डोळे विस्फारून ती ऐकत होती. वाचणे

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ९६