पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बळी पुन्हा एकदा वर निघणार आहे व त्या बळीचे राज्य पुन्हा एकदा येणार आहे, शेतकऱ्यांची इडा पिडा टळणार आहे आणि सगळीकडे आनंद मंगल होणार आहे ही आशा शेतकरी अजूनही मनांत बाळगून आहेत. पण असा बळिराजा कोण? कुठला? त्याने केले काय? त्याला संपविण्याकरिता प्रत्यक्ष विष्णूला अवतार घेऊन का यावे लागेल याचा थांगपत्ता लागत नाही. प्रल्हादाच्या प्रार्थनेला ओ देऊन विष्णूने नरसिंह अवतार धारण केला. त्याच प्रल्हादाचा पुत्र विरोचन आणि विरोचनाचा पुत्र बळी, प्रल्हादाच्या नातवाचा वध करण्याकरिता स्वत: विष्णूला पुन्हा एकदा घाईघाईने अवतार घ्यावा लागला हे मोठे गमतीशीर प्रमेय आहे. कागदोपत्री याचा खुलासा होण्याची काहीही शक्यता नाही. बळिराजा संपवण्यात आला एवढेच नाही, त्याची सगळी कहाणीच दडपून टाकण्यात आली.

 दुसरा शेतकरी राजा

 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुसरे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजीराजांविषयीचा अभिमान हा प्रत्येक मराठी शेतकऱ्यांच्या जणू रक्तातच असतो. शिवाजी कोण होता, कसा होता, काय होता याविषयी कोणाला काही वाचून ठाऊक आहे असे नाही. आधी शेतकरी समाजात वाचणारे कमीच आणि ज्यांना वाचता येते त्यांनी विश्वासाने वाचतो असे काही साहित्यही नाही. गावागावात फडांच्या वेळी, उरूस उत्सवांच्या वेळी गावगन्ना शाहिरांनी रचलेले पोवाडे हाच काय तो त्यांच्या माहितीचा आधार. दरबारातील भाटांच्या काव्याप्रमाणे शाहिरांच्या कवनांची रचनाही समोर बसलेल्या श्रोत्यांच्या औदार्याच्या अपेक्षेने होणारी. सुरवातीच्या शाहिरांच्या समोर बसलेल्या श्रोत्यांत प्रत्यक्षात लढायात भाग घेतलेले सरदार, दरकदार, शिपाई गडी उपस्थित असताना शाहिरांनी त्यांच्या अंगच्या शौर्य, दिलदारपणा इत्यादी गोष्टींचे अतिशयोक्त वर्णन करावे हे साहजिकच आहे. त्याबरोबर शत्रूला सर्व दुर्गुणांचा मूर्तिमंत पुतळा बनवावे आणि त्याला रौद्र अक्राळ विक्राळ मुखवटा द्यावा हेही तितकेच क्रमप्राप्त.समोर बसलेले श्रोते प्रत्यक्ष प्रसंगाचे साक्षीदार असले म्हणजे सत्यापासून अपलाप करण्याबाबत शाहिरांवर आपोआपच मर्यादा पडते. जसजसा काळ जाई आणि काहणी सांगोवांगीच ऐकलेले श्रोते पुढे येत, तसतसे इतिहासाचे इतिहास पण जाऊन मनोरंजक कथांचं स्वरूप यावे हे सहज समजण्यासारखे आहे.

 शेतकऱ्याच्या या दुसऱ्या राजाला कोणी वामन संपवू शकला नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने स्वराज्य स्थापले. जिवावर आणि स्वराज्यावर आलेल्या काळप्रसंगांना विलक्षण धैर्याने तोंड दिले आणि त्यांच्यार मात केली. दिल्लीश्वराच्या नाकावर टिच्चून राज्य संस्थेची द्वाही फिरविण्याकरिता राज्याभिषेकाने स्वराज्याचे

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख/७