आहे. तसेच स्वतः श्री. शरद जोशींनी या पुस्तकाचे सर्व स्वरूपाचे हक्क सर्व जनतेच्या स्वाधीन केले आहेत. अर्थात अपेक्षा अशी आहे की, यातील कोणत्याही भागाच्या पुनर्मुद्रणाच्या बाबतीतील माहिती मुद्रित प्रतींसह त्यांच्याकडे पोहोचावी.
या पुस्तकाच्या कामात डॉ. अरविंद वामन कुळकर्णी यांचे तसेच माझ्या ज्या इतर अनेक मित्रांचे सहकार्य मिळाले त्यांच्या आणि तपस्या मुद्रणालयाचे श्री. चिंतामण जोशी, मुद्रणालयाचा कामगार वर्ग आणि प्रकाशिका सौ. सुमित्रा अरविंद कुळकर्णी यांच्या ऋणाचा निर्देश न करणे चुकीचे ठरेल.
श्री. शरद जोशींकडून मिळालेले विचारांचे हे विशुद्ध बियाणे एका दाण्यातून शंभर दाणे काढण्याची शक्ती असलेल्या शेतकरी भावाबहिणींच्या हाती देताना एक विशेष आनंद होत आहे. या पुस्तकाच्या प्रत्येक प्रतिमागे शेतकरी संघटनेचा एक एक कार्यकर्ता जरी तयार झाला तरी श्रमाचे सार्थक झाल्यासारखे होईल.
अलिबाग २३-११-१९८२
आपला
सुरेशचंद्र म्हात्रे