ते पुजारी खरचं सांगतील का भक्तांना ? त्यांनी नाही सांगितलं, तरी हा मुद्दा निसर्गप्रेमी लोकांच्या नजरेत आणून द्यायलाच हवा.
आज तीन महिने होतील, मी नियमितपणे दत्ताच्या निार्मल्यावर काम करत आहे. हे करताना मला एक आत्मिक सुख मिळतं. रोज एक ते पाच किलोच्या दरम्यान हार आणि फुलं असतात. म्हणजे सरासारी दिवसाला अडीच किलो धरली तर ९० दिवसांचे २२५ किलो निर्माल्य माझ्या रोजच्या दहा ते पंधरा मिनिटं खर्च करण्यानं मार्गी लागलं आहे. आता माझ्याकडे दोन बास्केट आहेत, एकीत मी फुलांच्या पाकळ्या करून टाकतो. दुसरीत नुसती फुलं टाकतो. आणि एक दिवस सर्व फुलं आमच्या आवारातील जांभळाच्या झाडाच्या अळ्यात टाकतो. आमच्या सोसायटीत एकच झाड आहे. मात्र झाडाच्या अळ्यातली फुलं लवकर विघटन पावतात असा माझा अनुभव आहे. त्यानंतर बास्केटमधल्या पाकळ्यांचा नंबर लागतो. आणि संपूर्ण फुलं असलेल्या बास्केटमधील निर्माल्याला विघटन पावायला जास्त वेळ लागतो. तिन्ही प्रकारांत कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही.
उत्सवाच्या काळात आपल्याकडे निर्माल्यासाठी मोठे घट उभे केले जातात. सर्व निर्माल्य एका घाटात टाकून आपण काय साध्य करतो? अनेक ठिकाणचे निर्माल्य एकत्र करणं मुळात चुकीचं आहे, हेच आपल्याला का समजत नाही याचच आश्चर्य वाटतं. सर्व निर्माल्य एकत्र करण्याऐवजी प्रत्येकानी थोडेथोडं निर्माल्य देवाचा प्रसाद म्हणून घरी घेवून जावं आणि त्याचे व्यवस्थापन करावं. देव नक्की खूश होईल आणि खूश झाला की तो पावेलही.
पेढे, बर्फी, साखरफुटाणे, नारळ, लाडू असा प्रसाद घरी नेण्याऐवजी प्रसाद म्हणून निर्माल्य घरी नेण्याचे धारिष्ठ्य स्वत:ला निसर्गप्रेमी म्हणवणारे तरी करणार आहेत का? किंवा हेच धारिष्ठ्य ‘स्वच्छ भारत अभियानात स्वत:हून काम करणारे दाखवू शकणार आहेत का? निदान लोकांना हे पटवून देण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेणार आहेत का ?
आपल्याला आपला परिसर स्वच्छ ठेवायचा आहे ना? मग प्रसाद म्हणून निर्माल्य घरी न्यायलाच हवं किंवा मूर्तीवर हार-फुलं घालायची सवय स्वत:हून बंद करायला हवी. आपण यातलं काय स्वीकारणार आहोत ?
निर्माल्य - एक प्रसाद * ५१