नुकताच ताजा असलेले अनुभव मी आपणा सर्वांस सांगू इच्छितो. मी रोज सकाळी फिरायला जातो. येताना वाटेवर असलेल्या दत्ताचे दर्शन घेऊन परततो. साधारण तीन महिन्यांपूर्वी मला देवळातील पुजारी भेटले. ते एका पिंपात निर्माल्य गोळा करत होते. पिंप भरलेलं होतं, म्हणून त्यांना निर्माल्य दाबूनदाबून भरावं लागत होतं.
मी त्यांना विचारलं, “काय करता या निर्माल्याचं ?
"काय करणार? झाडूवाल्याला सांगतो कुठेतरी टाकून यायला."
"तो कुठं टाकतो?"
"माहीत नाही. घेऊन जातो खरा."
योगायोगानं झाडूवालादेखील तिथंच उभा होता.
पुजाऱ्यानं त्याला विचारलं, "काय रे, कुठे टाकतोस हे सर्व?"
मी कोणीतरी सरकारी अधिकारी असेन असं त्याला वाटलं म्हणून तो सांगायला तयार नव्हता. पुजाऱ्यानं त्याला माझ्याबद्दल खात्री देताच तो म्हणाला,"असंच उचलतो आणि नेऊन टाकतो लांब खाडीत."
दोघांच्याही चेहऱ्यावर असहायतेचे भाव होते.
मी विचारलं "इथंच निर्माल्याचं खत का नाही करत?"
"मालक नाही म्हणतात! या निर्माल्यामध्ये अनंत प्रकार असतात."
"कोणते कोणते ?"
"फुलं, हार या शिवाय गुळ असतो, खोबरं असतं, फुलवाती असतात, कापसाची वस्त्र असतात, भिजवलेल्या कणकेचे गोळे असतात, उदबत्या, मेणबत्या, काड्यापेटीतील जळक्या काड्या, कागद, शिवाय प्लॅस्टिकाच्या आणि कागदाच्या बंद पाकीटांत डालडा, अबीर, गुलाल, हळद कुंकू हेही असतं. हारामध्ये प्लॅस्टिकचे चकाकणारे गोळे असतात. पुष्पगुच्छात थर्माकोलचे बारी बारीक गोल असतात. अशा अनेक गोष्टी लोक निर्माल्यात टाकतात."
अरे बापरे!"आता याचं खत करायचं म्हणजे हे सगळं वेगळंवेगळं करायला हवं. ते कोण करणार?"
"म्हणजे खरा प्रश्न हे सगळं वेगळं कोण करणार हा आहे तर ?"
"हो ना!"
"पण मला सांगा, हे सगळं तुम्ही एकत्र का करता? आणि हे प्लॅस्टिकच्या पिशवीत असं गच्चं का बांधता ?"
निर्माल्य - एक प्रसाद * ४९