पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आपल्या घरावर ‘शून्य कचरा' असा फलक लावणे म्हणजे जाहिरीकरणच होय. ‘आधी केले मग सांगितले' असे असतानासुद्धा दारावर अशी पाटी का लावायची असा प्रश्न तुमच्या मनात साहजिकच डोकावेल.
 पण ही पाटी साधीसुधी नाहीये. हे एक प्रकारचे स्वत:चेच स्वत:ला बजावणे आहे.
 आपण एका घराशी बांधलेले आहोत हे जाहीरपणे सांगण्यासाठीच सौभाग्यवती स्त्री ही कपाळावर कुंकू लावते आणि गळ्यात मंगळसूत्र घालते. आपण विठोबाशी लीन झालेले आहोत हे जाहीर कण्यासाठीच वारकरी मंडळी गळ्यात माळ अन् कपाळावर टिळा लावतात.
 आम्ही जनतेचे सेवक आहोत हे सांगण्यासाठी समस्त राजकारणी मंडळी नाही का पांढरे कपडे घालतात !
 जसे कपाळावरील कुंकू, भालावरचा टिळा, अंगावरचे पांढरे कपडे तसाच ‘शून्य कचरा- येथे कचरा तयार होत नाही' हा दारावर लावलेला फलक.
 एकदा का आपण असे जाहीर केले की ते जाहीर करणेच आपल्याला सतत जागृत ठेवत असते. आज जर जाहीरपणे तुम्ही तुमच्या दारावर अशी पाटी लावलीत, तर उद्या सकाळी सोसायटीच्या सफाई कामगाराला कचरा द्यायला तुम्ही जेव्हा बाहेर याल, त्या वेळी ही पाटीच तुमच्याशी बोलले आणि तुमचे तुम्हीच मागे वळाल.
 नवे काहीही निर्माण होत नाही. आणि जगातील कोणतीही गोष्ट आपण नाहीशी करू शकत नाही. हा अविनाशित्वाचा नियम आपणा सगळ्यांनाच माहीत आहे. निसर्गातील वेगवेगळ्या चक्रांकडे आपण जाणीवपूर्वक बघितले पाहिजे. पाण्याचे चक्र बघा.
 पाणी... पाण्याची वाफ...वाफेचे ढग....ढगापासून परत पाणी.
 आपल्या आवतीभोवती असलेली झाडे बघा. ह्या झाडांमध्ये देखील एक चक्र असते. हवा, पाणी आणि जमीन यांमधील मूलद्रव्य यांपासून झाड बनते. झाडातून पाने बनतात, फुले बनतात, फळे बनतात. आपल्या आधीपासून ह्या वृक्षवल्ली ह्या पृथ्वीतलावर आहेत. इतकी वर्ष इतक्या अगणित झाडांनी बनवलेली पाने, फुले, फळे आणि स्वतः झाडे जन्मली आणि नाहीशी झाली. ती गेली कुठे ? याचा कधी आपण विचार केला आहे का ? या सगळ्यांची माती झाली. हेही एक चक्रच आहे. हवापाणी-मूलद्रव्य, त्यांची झाडे...झाडांपासून पाने, फुले, फळे अन् त्यापासून पुन्हा हवा, पाणी अन् मूलद्रव्य आणि माती. या चक्रात या सर्व गोष्टी फिरत असतात.

 आपणदेखील निसर्गातील चक्रांचा एक भाग आहोत. नुसते आपणच नाही, तर आपला आत्मादेखील या चक्रात अडकलेला आहे, हे आपणांस माहीत आहे.


१२ * शून्य कचरा