पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारणही सबळ होते. यशवंतराव चव्हाण त्या वेळी मुख्यमंत्री होते. आचार्य अत्रेंंनी त्यांच्या हे कानावर घातलेलं. निवेदन द्या म्हटल्यावर ते दिल्याचं अत्रे सांगत... पण काही घडलं नव्हतं... परत हात दाखवून अवलक्षण कशाला असं धनंजय कीर यांना वाटायचं... खांडेकरांची तगमग, तळमळ पाहून एकदा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली (याच वेळी पटवर्धन बुवा, अनंतराव गद्रे प्रभृतींची अशीच परवड चाललेली.) "मी डोळ्याने अपंग, अधू झालो हे खरे, परंतु सरकारकडे मी याचना करावयास जाणार नाही. माझ्या मनास ते मानवत नाही. अर्ज करणे म्हणजेच याचना करणे. मी जे कार्य केले त्याविषयी सरकारला काही गुणग्राहकता वाटत असेल तर सरकारने त्याची दखल घ्यावी... माझे कार्य मी कोणत्या स्वार्थी हेतूने केले नाही... ‘भिक्षापात्र अवलंबणे, जळो जिणे लाजिरवाणे' हे अगदी सत्य आहे. डोळे उघडे आहेत, तोपर्यंत मी घेतलेले कार्य तडीस नेऊन स्वाभिमानाने जगण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन." नंतर वि. स. खांडेकरांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने स्वतः घरी जाऊन त्यांना अर्थसहाय्य दिले होते... कीर बहुधा त्या वेळी रत्नागिरी मुक्कामी आपल्या आप्तांकडे होते असे आठवते.

 विदुषी इरावतीबाई कर्वे, समाजसेविका नि स्त्री जीवनाची नवी क्षितिजे'च्या लेखिका सौ. कमलाबाई टिळक, मालतीबाई किर्लोस्कर, कथाकार सुशीला पगारिया- अनेकजणी भाऊंना लिहीत. भाऊही उत्तरं पाठवत. विद्यार्थिनी वाचकांची पत्रे, संवाद, भेटणं ही असायचं. भाऊ वडिलकीच्या नात्याने सर्वांना लिहीत, बोलत, भेटत. त्यांच्या साहित्यातील स्त्री पात्रे, त्यांच्या अष्टनायिका मानसकन्याच होत्या. स्त्रीजीवन सुधारावं, त्यांनी शिकावं, नुसतं शिक्षित न होता सुशिक्षित व्हावं असं त्यांना वाटायचं. त्यांची अपूर्ण कादंबरी ‘सोनेरी स्वप्नं भंगलेली' हिंदीत पूर्ण करताना आणि तशीच अपूर्ण कादंबरी ‘नवी स्त्री' मराठीत संपादित करताना वि. स. खांडेकरांचा जो पुरोगामी दृष्टिकोन प्रत्ययास आला त्यातून ते ‘वंचितांचे वाली' म्हणून समोर येतात. हीच गोष्ट दलितांविषयी. ‘ध्वज फडकत ठेवू या' मध्येही प्रत्ययास येते.

 कथाकार जी. ए. कुलकर्णी, व्यवहाराने सार्वजनिक नव्हते, पण त्यांचा पत्रव्यवहार चोखंदळांशी नित्य असायचा, हे त्यांच्या प्रकाशित पत्रसंग्रहांवरून (जी. ए. ची निवडक पत्रे खंड १, २, ३, ४) स्पष्ट होते. जी. स. स्वतःहून फार कमी लोकांना लिहीत. त्यात आत्मश्लाघा अपवादानेच दिसून येते;

शब्द सोन्याचा पिंपळ/९३