पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मध्यप्रदेशात. मातृभाषेची विलक्षण ओढ. हिंदी, मराठीत दोन्हीत लिहीत. पण मराठीत कथा, कविता लिहूनही प्रकाशित होत नाही, हे पाहून त्यांनी एकदा खांडेकरांना लिहिलं, “नाही तर महाराष्ट्राच्या थंडगार उपेक्षेशी परत एकदा टक्कर देण्याची ताकद कुठं माझ्यात होती? मी माझ्या या दोन कृती (वाळवंटातील कळ्या आणि याचक या त्या कथा) घेऊन परत एकदा शेवटचा प्रयत्न करून पाहावा म्हणून महाराष्ट्रासमोर यायचा प्रयत्न करीत आहे. आपण जर त्याचे चीज करून ‘ज्योत्स्नेत स्थान दिलेत तरच मी मराठीत पुढे लिहीन. तसे न झाल्यास मला परत हिंदीच्या तोंडाकडे पाहावे लागेल. " पण तशी वेळ मुक्तिबोधांवरच का कुसुमाग्रज, चिं. त्र्यं. खानोलकर, रणजित देसाई प्रभृती साहित्यिकांवर आली नाही. याचे श्रेय खांडेकरांच्या साहाय्यकारी स्वभावासच द्यावे लागेल.

 अनेक साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले ते वि. स. खांडेकरांच्या पासंगामुळे. ही परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिसून येते. कुणाचे सूचक, कुणाचे अनुमोदक, कुणाचे प्रसारक, कुणाचे समर्थक तर कधी तटस्थ अशा अनेक भूमिका खांडेकरांनी पार पाडल्या, हे या संमेलनांच्या इतिहासाची पाने चाळताना लक्षात येते. तीच गोष्ट नाट्यसंमेलनांची. पण एका अर्थाने वि. स. खांडेकरांनी स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचं सांस्कृतिक नेतृत्व केलं. त्यांनी पिढ्या घडवण्याचं कार्य केलं. 'देवाचे देवाला आणि सीझरचे सीझरला' या म्हणीनुसार विवेकानं व्यवहार केला. मतभेदाचे प्रसंग आले तरी सभ्यता सोडली नाही, पण आपल्या मतप्रदर्शनात कचखाऊपणाही दाखवला नाही. आचार्य अत्रे यांच्याशी 'ललित' मधील झटापट असो की लघुनिबंधाचे जनक कोण? याची डॉ. आनंद यादव यांनी छेडलेली चर्चा असो, साच्यात ज्याचं माप त्याच्या पदरात टाकण्याचा त्यांचा विवेक महाराष्ट्र सारस्वत विसरू शकणार नाही. वि. स. खांडेकर हे करू शकले, कारण त्यांच्यातला समाजशिक्षक नेहमी जागा असायचा.

 चित्रकार धनंजय कीर यांची सन १९६३ च्या दरम्यान दृष्टी अधू झाली नि त्यांचे लेखन मंदावलं. (खरं तर संपलं!) खायची भ्रांत होती. हे वृत्तपत्रात आलं तसं वि. स. खांडेकर अस्वस्थ झाले. त्यांनी कीर याना पत्रांवर पत्रं लिहिली. त्यांचे एक उत्तर नाही, म्हणून त्यांचे स्नेही रमेश शिंदे यांना वि. स. खांडेकरांनी शोधून काढलं. त्यांच्याकरवी प्रयत्न केले, पण कीर काही बधले नाहीत. समदुःखी असल्याने (दृष्टिमांद्य) खांडेकरांची अस्वस्थता दिवसागणिक वाढत होती. कीर यांच्या बाजूनं नकाराचं, उपेक्षेचं

शब्द सोन्याचा पिंपळ/९२