पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मानतात. मी संपादित केलेल्या 'स्वप्न आणि सत्य' या कथासंग्रहात ‘स्वप्नातले स्वप्न' ही मूळ कथा वाचता येईल.

 वि. स. खांडेकर मृत्यूपर्यंत रूपककथा लिहीत राहिले. योगायोगाने त्यांच्या अंतिम रूपककथेचं नाव ही 'मृत्यू'च आहे. आपल्या जीवनकालात खांडेकरांनी सुमारे दोनशे रूपककथा लिहिल्या. 'कलिका’, ‘मृगजळातील कळ्या', 'वनदेवता' आणि मी संपादित केलेल्या 'क्षितिजस्पर्श' मध्ये त्या संग्रहित आहेत. निसर्गातील मानवेतर प्रतीकांच्या माध्यमातून मोजक्या पात्रांद्वारे मानवी जीवन संबंधातील एखाद्या बाबींचा ठसा रूपककथा आपल्या मनावर उमटविते. या कथेत एक ध्वनित अर्थ असतो. कल्पकतेवर ती उभारलेली असते. व्यक्तिगतता हा तिचा आधार असतो. चमत्कृतीपूर्ण शेवट हे रूपककथेचं आगळे वैशिष्ट्य असतं. रूपक अलंकारासारखी ही कथा. म्हणून तिला ‘रूपककथा' म्हणतात. ही कथा नीतिकथा, प्रतीककथा, दृष्टांतकथा, काव्यकथा, गद्यकाव्य म्हणूनही ओळखली जाते.

 वि. स. खांडेकर हे मराठी रूपककथेचे जनक म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांना मराठीचा विष्णू शर्मा म्हणून ओळखलं जातं. प्रारंभी त्यांनी खलील जिब्रानच्या रूपककथांचे अनुवाद केले. रवींद्रनाथांच्या अनेक रूपककथांची रूपांतरेही केलीत. मग ते मौलिक रूपककथा लिहू लागले. १९३0 ते १९४0 या दशकातील रूपककथा ‘कलिका' संग्रहात आहेत. या कथा आकाराने छोट्या आहेत. दोन मिनिटात वाचून होणा-या पण दोन वर्षं अस्वस्थ करणा-या या कथा. खांडेकरांच्या रूपककथा परिणामकारक असतात. त्यांचा शेवट मार्मिक असतो. त्या जितक्या रंजक तितक्याच विचारोत्तेजक असतात. ‘छोटा दगड’, ‘तीन कलावंत', ‘स्वप्ने' यांसारख्या या संग्रहातील कथा वाचनीय आहेत. या कथांवर इसाप, विष्णू शर्मा, खलील जिब्रान, रवींद्रनाथ ठाकुर यांच्या कथांचा प्रभाव दिसून येतो.

 ‘मृगजळातील कळ्या' मधील ‘फुले आणि दगड’, ‘दोन पतंग', ‘क्षितिज', 'निसर्ग आणि माणूस', कथा तृणांकुरांप्रमाणे आकर्षक व कलात्मक आहेत. 'वनदेवता' रूपककथासंग्रहात १९५०-६० च्या रचना संकलित आहेत. 'शांती', 'वनदेवता', ‘अनाथ' यांसारख्या श्रेष्ठ कथा अविस्मरणीय आहेत. 'क्षितिजस्पर्श' मधील ‘मृत्यू', 'बुद्ध, ख्रिस्त आणि गांधी', ‘वृद्ध प्राजक्त', 'पाऊस' या कथांमध्ये 'चकोर आणि चातक' चं सौंदर्य भरलेलं आहे.

शब्द सोन्याचा पिंपळ/८४