पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
अस्वस्थ करणारं स्त्रीजीवन : ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी'


 श्रीमती रमाबाई रानडे यांनी लिहिलेल्या ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी' ही मराठीतील पहिली स्त्री-आत्मकथा मानली जाते. ती सन १९१० साली लिहिली गेली. त्या अर्थाने २०१० हे मराठी स्त्री आत्मकथेचे शताब्दी वर्ष होय. या आत्मकथेस गोपाळ कृष्ण गोखले यांची प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेत गोखले यांनी ‘पत्नीने आपल्या पतीबद्दल अशा त-हेने लिहिलेला हा पहिलाच ग्रंथ हिंदुस्थानात आहे असे वाटते' म्हणून केलेली भलावण लक्षात घेता, या आत्मकथनपर ग्रंथाचे भारतीय साहित्याच्या दृष्टीने राष्ट्रीय व ऐतिहासिक महत्त्व सिद्ध होते.

 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या रमाबाई या दुस-या पत्नी होत. न्यायमूर्तीचे पहिले लग्न त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी झाले. ते एकतीस वर्षांचे असताना, त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. न्यायमूर्ती पुरोगामी विचारांचे असल्याने, त्यांना दुसरा विवाह करावसाचा नव्हता; पण वडिलांचा शब्द प्रमाण मानून त्यांनी दुसरा विवाह केला. अल्पवयीन कुमारिकेशी विवाह केला, म्हणून त्या वेळी ते टीकेचे लक्ष्यही बनले होते.

 या पुस्तकास रूढ अर्थाने स्त्री-आत्मकथन म्हणता येणार नाही. कारण यात रमाबाईंनी स्वतःबद्दल फारसे लिहिलेले नाही. या पुस्तकाचा नायक न्यायमूर्ती रानडे आहेत. नायिकेने त्याची कथा सांगितली आहे. संपूर्ण पुस्तक वाचताना एक गोष्ट लक्षात आल्यावाचून राहात नाही की, यातून ना न्यायमूर्ती रानडे यांचे संपूर्ण चरित्र वा जीवन स्पष्ट होते, ना रमाबाई रानडे यांचे. या उभयतांच्या जीवन प्रवासाची ही आंशिक कौटुंबिक कहाणी आहे. ती रमाबाईंनी आठवणींच्या स्वरूपात स्पष्ट केली आहे. त्या आठवणी

शब्द सोन्याचा पिंपळ/६३