पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाजकार्यासाठी प्रवृत्त राहण्याचे आवाहन करतात. असं विषय वैविध्य घेऊन येणारं ‘ज्वाला आणि फुले' सामाजिक प्रश्नांच्या ज्वालांची दाहकता दाखवतात. जहाल कवितांतूनही समाज मांगल्याची भावना बाबा आमटे तसूभरही कमी होऊ देत नाही हे विशेष! या रचनांतून ‘सडलेल्या पंखांना उडण्याचा ध्यास लावायची त्यांची तळमळ प्रत्येक ओळीत प्रतिबिंबित आहे. ‘झुंजत राहा, ढासळू नका'चा संदेश देणारं हे काव्य-

 फुलांचे व मधमाश्यांचे नाते आहे

 ते रक्ताचे व जळवांचे नाते नाही

 म्हणत मनुष्यसंबंधाचं महत्त्व सार्वकालिक असल्याचं ते बिंबवतात. ‘आनंदवन' हे बाबा आमटेंचे कार्यकर्तृत्व! त्याची महती त्यांच्याच शब्दात सांगायची तर-

 'येथे नांदतात श्रमर्षी, या भूमीला शरण नाही

 येथे ज्ञान गाळते घाम, विज्ञान दानव शरण नाही

 येथे कला जीवनमय, अर्थाला अपहरण नाही

 येथे भविष्य जन्मत आहे, या सीमांना मरण नाही'

 वाचत असताना आपल्या निष्क्रियतेची शरम आल्यावाचून राहात नाही. श्रम, जिद्द, अभाव, उपेक्षा यांचं वरदान ज्यांना लाभतं तेच काही करू शकतात. यातनाहीनांना पुरुषार्थ करता येत नाही. अधिक करायचं तर (आधी) अधिक, सोसावं लागतं' सारखी या कवितांमधील सुभाषितं केवळ शब्दांची फेक नसते, तर संघर्ष भोगण्यातून उडालेल्या त्या ठिणग्या असतात. त्या वाचकांत क्रियाशीलतेचा वन्ही पेटवतात... त्याला प्रज्वलित, प्रभावित करतात म्हणून ज्वाला आणि फुले' वाचलेला माणूस कधी स्वस्थ झोपू शकत नसतो.

 “ज्वाला आणि फुले' काव्य वरील तपशिलांमुळे तर महत्त्वाचे खरेच. पण त्यापलीकडे जाऊन या काव्याची काही बलस्थाने आहेत ती वाचताना लक्षात येते की, ही कविता ज्या प्रदेशात फुलली त्या मातीला मिळालेल्या निसर्ग उपेक्षेमुळे व (राजकीय दुर्लक्षामुळेही असेल कदाचित!) इथले सारे कवी असामान्य कलंदर, कलाकार, बाबा आमटेंच्या निमित्ताने मला आठवले ग्रेस, सुरेश भट नि आता वसंत आबाजी डहाके हेसुद्धा. या सा-यांच्या कवितेतलं कला, विचार, बंडाचे निशाण आपण नाही खांद्यावर घेऊ शकत. विदर्भाचा अनुशेष आर्थिक, राजकीय, सामाजिक असू शकेल. प्रतिभेच्या प्रांतात सरशी त्यांचीच. त्या मातीतच रोखठोक प्रश्न करायचं धारिष्ट्य

शब्द सोन्याचा पिंपळ/५७