पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपले काम करणारा कोणताही माणूस या जगातल्या तीन थोर गोष्टी होत. त्यांच्या शक्तीगर्भतेला परिमाण नाही.' बाबा आमटे लालबहादूर शास्त्रींना या कसोटीवर ‘सामान्य महामानव' म्हणजे सामान्य असून महामानव वाटतात. एका शास्त्रीचं शास्ता (शासक) होणं, हवं तेव्हा त्याचं शस्त्रधारी नि शांतिदूत होणं, लौकिक उंची कमी असून अलौकिकतेनं प्रतिष्ठेचं शिखर सर करणं, अन्नान्न दशा झालेल्या देशाला दिश देणं... किती मोठा माणूस हा - सामान्य तरी असामान्य!

 ‘मी जवाहरलाल' या संग्रहातलं एक मनस्वी काव्य! ही कविता म्हणजे नेहरूंच्या भ्रमभंगाचं शोकगीत. या मातीला दिलेलं अभिवचन आपण पूर्ण करू न शकल्याचं शल्य नेहरुंनी आपल्या अस्थी, राख गंगेत न टाकता शेतात टाकण्याची इच्छा व्यक्त करून व्यक्त केली होती. ‘हिंदी-चिनी भाई भाई'च्या सहअस्तित्वाचा चीन आक्रमणाने झालेला अंत, देशांतर्गत उद्भवलेली विविध शीतयुद्धे या सर्वांत हा गुलाब होरपळला... कवितेतील प्रत्येक ओळ म्हणजे अनिवार शोकतप्त भावनांची स्वरलिपी! ‘संतांचे मृत्यूपत्र' काव्य तुकडोजी महाराजांच्या मृत्यूपत्राला समर्पित काव्य! तुकडोजींची ‘ग्रामगीता' कवीला ‘टेस्टामेंट'पेक्षा कमी वाटत नाही. तुकडोजी महाराजांचे महत्त्व कवीला वाटतं कारण त्यांनी सामान्य माणसास समाजसक्रिय केलं. सामान्य माणूस समाजाची 'Front Line of Action' होणं हे त्यांच्या भक्ती संगठन कौशल्याचं फलित वाटतं. देहदान, नेत्रदान, हृदयदान इतकंच नव्हे तर शाबूत असेल ते समाजास देण्याची शपथ साच्या समाजाकडून वदवून घेणारा हा संत स्वतःच रोगग्रस्त होऊन विकल, जर्जर होतो तरी झटण्याचं समाज जहाज सोडत नाही याचं कवीला कोण अप्रूप? अशा सर्वातून ते वाचकास थोरांची थोरवी सांगत सामान्यांना असामान्य बनविण्यासाठी आपली प्रतिभा खर्च करतात.

 ज्वाला आणि फुले'च्या कितीतरी कविता सामाजिक प्रश्न, कृतिप्रवणता, श्रम माहात्म्य, शेतकरी, श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ, सोमनाथ श्रम संस्कार छावणी, घामाचे महत्त्व विशद करणा-या आहेत. या संदर्भात जिथे आत्म्याचेही अन्न विकेल', '... या सीमांना मरण नाही!' ‘वसुंधरेचा पुत्र', ‘श्रम-सरितेच्या तीरावर' सारख्या कविता लक्षात येतात. पण बाबा आमटे ‘आदिमानव उठला आहे' मध्ये ते अण्वस्त्राचा प्रश्न हाताळतात. सागाड्यांचं शहर' हे काव्य औद्योगिकरणातील भयावह स्थिती चित्रित करतं. एक खिंड मी लढवीन'मध्ये ते तमाम ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतरही

शब्द सोन्याचा पिंपळ/५६