पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘एकलव्य'ला एकाकी महामानव म्हणून चित्रित करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की, अरे, सॉक्रेटिस, कोपर्निकस, डार्विन, ज्ञानेश्वर, तुकाराम, गांधी, साने गुरुजी सारेच एकाकी महामानव होते. अत्युच्च मनस्वीता पेलणं हे महामानवांचं त्यांनी रेखांकित केलेलं लक्षण, ठरवलेली कसोटी... त्यावर वरील सर्वांना पारखणं शक्य आहे. अशाच परंपरेत ‘गांधी : एक युगमुद्रा' ही कविता ठेवावी लागेल. महात्मा गांधींच्या किती युगमुद्रा बाबा आमटे ‘ज्वाला आणि फुले'मध्ये अधोरेखित करतात. महात्मा गांधींच्या युगाचा चेहरा, हिमनग, कलाकार, जहाज, हिकमती माणूस, नंगा फकीर, संतमानव, काळावर उठलेली तप्त मुद्रा असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व! महात्मा गांधींच्या सर्व जीवन, कार्य, विचार, व्यवहारात एक 'Vergin line of Action होती असं आपण कवितेत वाचतो तेव्हा बाबा आमटेंच्या प्रतिभेच्या विजेनं चकित व्हायला होतं. महात्मा गांधींवर वि. स. खांडेकरांनी गांधी जन्मशताब्दी वर्षात विपुल लिहिलं. त्याचे संकलन, संपादन करून मी ‘दुसरे प्रॉमिथिअस : महात्मा गांधी' असं पुस्तक सिद्ध केलं, तेव्हाही माझ्या हे लक्षात आलं होतं की, महात्मा गांधी आपल्या प्रत्येक विचार, व्यवहारात ‘विवेकाची लक्ष्मणरेषा' ठरवत नि पाळत. गांधींचं मोठेपण या 'Vergin line of Action' मध्येच होतं, हे वाचकास पटतं.

 ‘त्याने प्रथम मिठाच्या पुडीला हात घातला

 आणि मग एक साम्राज्य

 मिठाच्या सातासमुद्रापलीकडे फेकून दिले.

 त्याने सुतावरून सुरुवात केली

 आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला.

 याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि

 एक देशच्या देश बांधून दाखवला.'

 म्हणून बाबा आमटे आपलं आकलन स्पष्ट करतात तेव्हा महात्मा गांधी हे त्यांच्या विचार, वृत्तीचे अधिष्ठान कसं होतं, ते सिद्ध होतं.

 तीच गोष्ट लाल बहादुर शास्त्रींची. “जय हे, सामान्य महामानव' मध्ये बाबा आमटेंनी शास्त्रीजींची गायलेली थेरवी त्यांच्या प्रती वाहिलेली श्रद्धासुमने होत. लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या कविता अशीच श्रद्धा-सुमने होत. ‘गांधी : एक युगमुद्रा' ही याच पठडीतील. एडवर्ड वॉक या पाश्चात्य विचारवंताने एके ठिकाणी लिहिलंय, ‘पहाड, सागर आणि जीव ओतून

शब्द सोन्याचा पिंपळ/५५