पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'गोदान' केवळ कलात्मकदृष्ट्या श्रेष्ठ रचना नव्हे. विचारगर्भ कादंबरी म्हणूनही तिचं सामाजिक नि साहित्यिक मूल्य आहे. या कादंबरीद्वारे प्रेमचंदांनी कर्जमुक्त शेतक-याचं स्वप्न पुढे ठेवलं नि रामराज्याचं समर्थन केलं. स्वातंत्र्याचं सुराज्य करायचं तर उद्याचा भारत सावकारी पाशातून मुक्त व्हायला हवा. जमीनदारांच्या कचाट्यातून मुक्त झाल्याशिवाय शेतकरी आणि त्याचे कुटुंबिय सुखाचे दोन घास खाऊ शकणार नाही याची जाण ‘गोदान'ने निर्माण केली. शिक्षण प्रसाराशिवाय खेड्यातील जनता देवा-ब्राह्मणांच्या दुष्टचक्रातून मुक्त होऊ शकणार नाही, हे प्रेमचंदांनी 'गोदान'च्या माध्यमातून प्रभावीपणे बिंबवलं. जीवनाचं उघडं-नागडं वास्तव रंगवणं, हे प्रेमचंदांना मान्य नव्हतं. जोवर आपण नवदिशा दिग्दर्शन करणार नाही, तोवर केवळ नग्न यथार्थ काय कामाचा, अशी ते पृच्छा करत. गोदान'च्या माध्यमातून त्यांनी नवभारताचे भविष्य रंगवले, सुचवले. भांडवलदारी व्यवस्थेचा निःपातच समाजातील तळागाळातील जनतेच्या सामाजिक न्यायाचा मार्ग असल्याचं भान ‘गोदान' कादंबरी प्रभावीपणे देते. साम्यवाद नि गांधीवादाचा समन्वय करणारा प्रगतीवाद, प्रगतीमार्ग ‘गोदान'च्या माध्यमातून प्रेमचंदांनी स्पष्ट केला. ‘इन्कलाब' सर्व प्रश्नांचे उत्तर असू शकत नाही, हे प्रेमचंदांनी पूर्णपणे ओळखलं होतं. म्हणून त्यांनी ‘गोदान'मधून समन्वयवादी वृत्तीचं समर्थन केलं. मध्यमवर्गीयांना त्यांनी नवबदलाचे, परिवर्तनाचे अग्रणी चित्रित करून ‘गोदान'मधून समाजबदल गतिशील केला. मानवतेचे उपासक असलेले प्रेमचंद गोदानद्वारे भूतदयाही रुजवताना दिसतात. प्रेमचंद भाववादी लेखक होत. निव्वळ बुद्धिवादाने वाद होतात. संवाद व्हायचा तर बुद्धिवादास भाववादाची जोड मिळायला हवी, हे 'गोदान' कादंबरी मार्मिकपणे समजावते. अहिंसा, शांती, समन्वय, हृदयपरिवर्तनासारखी महात्मा गांधींची विचार चतुःसूत्री हे 'गोदान'चं पाथेय होय. प्रेमचंदांनी गोदान ही कादंबरी हिंदीत कलात्मक, सामाजिक, वैचारिक दिशांतर सुचविणारी कादंबरी म्हणून शीर्षस्थ मानावी लागते. स्त्रीजीवनाबद्दल आस्था, दलितांबद्दल कणव, दःखितांबद्दल सहानुभूती जागवणारी 'गोदान' कादंबरी समाजाच्या वंचित नि उपेक्षितांचं अधिराज्य, स्वराज्य निर्माण करू इच्छिते म्हणूनही पथदर्शक,

▄ ▄

शब्द सोन्याचा पिंपळ/४६