पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दाबायच्या. पात्रांना कथेत गौण स्थान राहायचं. 'गोदान'मुळे हिंदी कादंबरी पात्रकेंद्री झाली. होरी, धनिया, गोबर ही पात्र अजरामर झाली ती गोदानच्या पात्रप्रधान कथा वैशिष्ट्यामुळेच. 'गोदान' कादंबरीची जवळजवळ सर्वच पात्रं आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे व कधी कधी त्यांच्या प्रश्नांमुळे वाचकांच्या हृदयाला भिडतात. ठोकळेबाज पात्राऐवजी व्यक्तिनिष्ठ पात्र रुजवायची परंपरा प्रेमचंदांनी 'गोदान' कादंबरीच्या माध्यमातून सुरू केली व ती रुळून गेली. 'गोदान'ने हिंदीत चरित्र चित्रणाची एक नवी वाट मळली. 'गोदान'मध्ये छोटे संवाद जसे आहेत तसेच भाषणबाजी करणारेसुद्धा आहेत; परंतु 'गोदान'मधील छोटे संवाद अधिक भावतात, भिडतात. वातावरणनिर्मिती ही ‘गोदान' चा सर्वांत मोठा गुण. शहर नि खेडे दोन्ही प्रेमचंदांनी कादंबरीत जिवंत चित्रित केलंय. खेड्यातील लोकमर्यादा, परंपरा, अंधश्रद्धा, राहणीमान, लोकधारणा, नातीगोती, परस्पर सौहार्दता चित्रित कराव्यात प्रेमचंदांनीच. ‘गोदान' म्हणजे मोठ्या कॅनव्हासवर रंगवलेलं गांधींच्या स्वप्नपूर्व भारताचं हबेहब चित्र, विसाव्या शतकाच्या प्रारंभीचं भारतीय सामाजिक, राजनैतिक, आर्थिक, सांस्कृतिक चित्र ज्यांना समजून घ्यायचंय, त्यांनी ‘गोदान'ची पारायण करायलाच हवीत. गोदान'पूर्व हिंदी कादंबरी कल्पना, उपदेश, इतिहास, अवतारवादात अडकलेली होती. तिला वास्तवाचं भान ‘गोदान'नं दिलं. आदर्शाकडे समाज नेण्याचा गांधींचा स्वप्नाळू ध्येयवाद प्रेमचंदांनी जोपासला. भारतीय शेतकरी अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार, शोषण, परंपरेतून मुक्त करण्याचा ध्यास ‘गोदान'च्या पानोपानी आढळतो. प्रेमचंदांनी ‘गोदान'च्या माध्यमातून संस्कृतप्रचुर हिंदीस उर्दूप्रचुर बनवलं. पूर्व हिंदी कादंबरीची भाषा अलंकारांच्या चक्रव्यूहात अडकली होती. तिला सहजतेचा साज गोदान'मुळे उमजलं. वाक्प्रचारयुक्त भाषा जीवनस्पर्शी होते. त्यामुळे भाषेत वर्षाचं संचित साठतं याचा प्रत्यय प्रेमचंदांनी 'गोदान'च्या भाषेमुळे आणून दिला. एका नव्या संपृक्त शैलीचा शिलान्यास ‘गोदान'ने केला. या कादंबरीचं शीर्षक तर अधिक कलात्मक नि सार्थ म्हणावं लागेल. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या भारतीय अशिक्षित, अंधश्रद्ध, धर्मपरायण, पारंपरिक शेतक-याचं सर्वांत मोठं स्वप्न असायचं, ब्राह्मणाला गायीचं दान (गोदान) देऊन पुण्यप्राप्ती करायची. मोक्षाची शाश्वती मिळवायची. पुनर्जन्मी पुन्हा अधिक संपन्न अशा मनुष्यजीवन लाभाची लालसा यात भरलेली असायची. इतक्या छोट्या शीर्षकात प्रेमचंदांनी भरलेला व्यापक आशय हिंदीतच सांगायचा झाला तर गागर में सागर'च.

शब्द सोन्याचा पिंपळ/४५