पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होतो व एक दिवस शेतात मजुरी करत असतानाच उष्माघाताने मृत्युमुखी पडतो. अशी समग्र भारताचे वास्तव चित्रण करणारी ही कादंबरी.

 तिचं श्रेष्ठत्व कशात दडलंय असं विचाराल तर हे सांगायला हवं की, ही कादंबरी विसाव्या शतकातील प्रारंभीचा भारत आपल्यापुढे उभा करते. ती अनेक अंगांनी हिंदीतील श्रेष्ठ कादंबरी ठरते. १९३२ ला प्रेमचंदांनी ही कादंबरी लिहायला घेतली. १९३६ ला तिचं प्रकाशन झालं. प्रेमचंदांनी ‘सेवासदन' (१९१८) नी आपल्या हिंदी कादंबरी लेखनास ख-या अर्थाने सुरुवात केली. गोदान' (१९३६) पर्यंत त्यांनी 'प्रेमाश्रम', 'निर्मला', ‘रंगभूमी’, ‘कायाकल्प', ‘गबन', 'कर्मभूमी', शिवाय 'वरदान', 'प्रतिज्ञा', ‘मंगळसूत्र' (अपूर्ण) कादंब-या लिहिल्या. तत्पूर्वी त्यांनी उर्दूमध्येही कादंबरी लेखन केलं होतं. पूर्व कादंब-यांच्या तुलनेत ‘गोदान' ही तशी उजवी रचना म्हणावी लागेल- शिल्प, शैली, विचार, भाष सर्वच दृष्टीने. प्रेमचंदांचे समकालीन कादंबरीकार जैनेंद्रकुमार यांनी प्रेमचंदांवर एक सुरेख पुस्तक लिहिलंय. प्रेमचंद : एक कृति व्यक्तित्व' असं त्याचं नाव आहे. या पुस्तकाची हिंदीत व्हावी तितकी चर्चा झाली नाही. त्यात कादंबरीकार प्रेमचंद कसे श्रेष्ठ होते, हे जैनेंद्रकुमारांनी स्पष्ट केलंय. त्यात शेवटचं प्रकरण मोठं मनोज्ञ आहे - ‘प्रेमचंद का 'गोदान' यदि मैं लिखता...' या प्रकरणाच्या पहिल्याच वाक्यात जैनेंद्र म्हणतात, “अगर मैं 'गोदान' लिखता? लेकिन निश्चय है, मैं नहीं लिख सकता था, लिखने की सोच नहीं सकता था' यातच प्रेमचंदांचं, ‘गोदान'चं श्रेष्ठत्व सामावलेलं आहे, असं मला वाटतं. त्यात त्यांनी स्पष्ट केलंय की, ‘गोदान'सारखी कादंबरी लिहायची तर अधिक समज असणं गरजेचं. त्यातील पात्रं केवळ प्रेमचंदच पेलू जाणे. प्रेमचंद तर भाषेचे जादूगारच. वाक्प्रचारयुक्त भाषा, भाषेचा खेळ त्यांनाच जमतो. वर्णनशैली अशी की शब्द मला घ्या, मला घ्या म्हणत पुढे येत असावेत...' ही सारी एका अर्थाने ‘गोदान'चीच वैशिष्ट्ये होत. तीच या कादंबरीस कलात्मकदृष्ट्या श्रेष्ठ नि शीर्षस्थ ठरवतात.

 'गोदान'मध्ये ग्रामीण व शहरी भारताची दोन स्वतंत्र चित्रं एकमेकांत विलक्षण कौशल्याने गुंफून प्रेमचंदांनी भारताचं एक समग्र चित्र वाचकांपुढे ठेवण्याचा कलात्मक प्रयत्न केला आहे. हे चित्र एका अर्थाने ‘भारत' विरुद्ध इंडिया' असेच आहे. दोन समांतर कथा एकजीव करण्याचं प्रेमचंदांचं कौशल्य थक्क करणारं आहे. काहींचे याबाबत मतभेद आहेत खरे. हिंदीच्या पूर्वीच्या कादंब-यांत घटना अधिक असायच्या. त्या पात्रांना झाकायच्या,

शब्द सोन्याचा पिंपळ/४४