पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सर्वश्रेष्ठ हिंदी कादंबरी : ‘गोदान'



 मराठी व हिंदी साहित्य विकासात अंतर असले, तरी एका बाबतीत मात्र साम्य आढळते. ते म्हणजे, कादंबरीतील ग्रामीण चित्रण. दोन्ही भाषांतील साहित्यात ग्रामीण जीवनाचे चित्रण १९२० नंतर सुरू झाले. याच सुमारास महात्मा गांधींनी 'खेड्याकडे चला'चा संदेश दिलेला होता. खरा भारत पाहायचा तर भारतीय खेडे पाहायला हवे, असे गांधीजी आग्रहाने सांगत. त्यांचे राजकीय गुरू असलेल्या गोपाळ कृष्ण गोखल्यांनी दक्षिण आफ्रिकेतून देशसेवेसाठी स्वदेशी आलेल्या गांधींना प्रथम सर्व देश पाहण्याचा सल्ला दिला होता. त्यातून भारताचे खरे चित्र, खरा चेहरा गांधीजींच्या लक्षात आला होता. १९२० च्या दरम्यान लेखन करणारे मराठी हिंदी कादंबरीकार महात्मागांधींच्या विचार व कार्याने प्रभावित झालेले होते. मराठीत श्री. म. माटेंच्या लेखनाने ग्रामीण चित्रणाचा प्रारंभ मानला जातो. ग. ल. ठोकळ, र. वा. दिघे, वि. वा. हडप, सोपानदेव चौधरी, कवी यशवंत, गिरीश ही मंडळी मराठीतील प्रारंभिक ग्रामीण जीवन चित्रमय करणारे साहित्यकार म्हणून सांगता येतील. वि. स. खांडेकरांनी शहरी नि मध्यमवर्गीय जीवनाचे चित्रण करणारे लेख लिहिले असले तरी त्यांचा प्रेरणास्रोत कोकणातील शिरोड्यासारखं खेडंच होतं, हे विसरून कसं चालेल?

 तीच गोष्ट हिंदी साहित्याची. 'प्रेमचंद युग' नावानं ओळखलं जाणारं समग्र हिंदी साहित्य हे गांधी विचारांचे अपत्य होय. प्रेमचंदांच्या 'सेवासदन' (१९१८) ते 'गोदान' (१९३६) सारख्या कादंब-यांच्या प्रकाशन कालखंडात लिहिणारे चतुरेन शास्त्री, ऋषणचरण जैन, जैनेंद्रकुमार, प्रसाद, यशपाल, अज्ञेय, इलाचंद्र जोशी, भगवतीप्रसाद वाजपेयी, सुदर्शन यांसारखे कादंबरीकार व त्यांच्या प्रारंभिक रचनांवर हा प्रभाव लक्षात येण्याइतका स्पष्ट आहे.

शब्द सोन्याचा पिंपळ/४२