पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
दिसामाजी काहीतरी लिहावे



 काही पुस्तकं तुमचं जीवन बदलून टाकतात. ज्यांनी 'दासबोध' वाचला असेल त्यांना हे पटेल. त्यातला देव, मोक्ष, आत्मज्ञान मला पटत नाही. पण या ग्रंथात माणसाचं चरित्र नि चारित्र्य घडविण्याची विलक्षण तळमळ आढळते. 'मूर्ख लक्षण दशक' वाचा. तुम्ही उत्तम लक्षणी व्हाल. पढतमूर्ख व्हायचे नसेल तर दासबोध वाचायलाच हवा. ‘मध्यस्त लिहिण्याची करणी शिकवणारा हा ग्रंथ एकदा तरी वाचायलाच हवा. असेच एक पुस्तक आहे खलील जिब्रानचे. ‘प्रोफेट'. हे ‘जीवनदर्शन' नावाने मराठीत उपलब्ध आहे. जीवनाचा सर्वांगी विचार जे पुस्तक समजावते. तसेच हे पुस्तक आहे ‘कुरल'. तमिळ भाषेतील तिरुवल्लूवर कवीनं लिहिलंय ते. मराठीत साने गुरुजींनी त्याचे भावविभोर भाषांतर केले आहे. ही नि अशी पुस्तके असतात जीवनऊर्जेचे अखंड स्रोत! ती तुम्हाला वाचायला, लिहायला शिकवतात तशी जगायलाही!
 जगायचं कशासाठी हे 'बायबल' जितकं चांगलं शिकवतं, तितकं अन्य धर्मग्रंथ नाही. कुराण' म्हणजे कर्मठपणा असं मानण्यात काय अर्थ आहे? मनुष्य दुराचारी होऊ नये म्हणून कुराणातील आयते जी तळमळ व्यक्त करतात ती घ्यावी. बाकी सोडून टाकावं. साहित्य वाचत असताना कबीरानं सांगितलेली सत्शील वृत्ती मला नेहमीच मार्गदर्शक वाटते. कबीरांनी आपल्या काव्यात सत्शील माणसास ‘साधू' म्हटलं आहे. साधू सुपासारखा असतो. कचरा, खडे तो फुकून, फेकून देतो आणि जीवनोपयोगी आपल्याकडे ठेवतो.

 महात्मा गांधींनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातली सर्वांत महत्त्वाची म्हणजे, ‘झोपण्यापूर्वी क्षणभर घालवलेल्या दिवसाचा विचार

शब्द सोन्याचा पिंपळ/२२