पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जी माणसं चित्रं वाचू शकतात ती मग वाचू लागतात. ज्यांना माणसाची पारख करता येते तो शहाणा. शहाणपण येतं ते वाचनाने.

 वाचन आपला श्वास व्हायला हवा. श्वास घेतल्याशिवाय आपणास जगता येत नाही. वाचनाशिवाय आपलं जग, जीवन, जगणं बदलणं अशक्य. ‘प्रसंगी अखंडित वाचित जावे'चा संस्कारच तुम्हाला ज्ञानसंपन्न करतो. एकदा का वाचनाचा छंद जडला तर मग तुम्हाला सारं व्यर्थ, तुच्छ वाटू लागेल. रेडिओ, टी.व्ही., सिनेमापेक्षा पुस्तकं कितीतरी पटीनं आपणास समृद्ध करत असतात.

 वाचनाने वेळ जातो. आपलं मनोरंजन होतं. नवे ज्ञान होते. नवा दृष्टिकोन येतो. आपण जन्मतः एकाकी, एकांगी असतो. वाचन आपणास बहुश्रुत, सामाजिक बनवतं. वाचनाने चिंता दूर होऊन माणूस चिंतन करू लागतो. तो विचारी होतो. वाचनामुळे विविध ज्ञान-विज्ञानाचा परिचय होतो. विविध भाषा, संस्कृती, देश, माणसं समजतात. वाचन माणसास सहनशील बनवतं. माणसाची कल्पनाशक्ती विस्तारते ती वाचनामुळेच. स्वतःचा शोध ज्यांना घ्यायचा आहे, ज्यांना स्वतःला जाणून घ्यायचं आहे त्यांना वाचनाशिवाय पर्याय नाही.

 वाचनाचं वेड म्हणजे जगण्याचं वेड. माझे एक साहित्यिक मित्र होते. त्यांची मुलगी मोठी झाली. लग्न ठरवायला, दाखवायला म्हणून ते मुलीला नवच्या मुलाच्या घरी घेऊन गेले. लग्न ठरवणं म्हणजे युद्धाची चर्चा. तह, शह, कट, काटशह सारं असतं. त्याला भरपूर वेळ लागतो. दोन्हीकडची मंडळी चर्चेचे गु-हाळ चालवत राहिली. परक्या घरात गेलेल्या मुलीचा वेळ जाता जाईना. तिनं त्या घरी वाचायला काही आहे का विचारलं? त्या घरी वाचायला काही नव्हतं. त्या मुलीनं तिच्या बाबांना बोलावलं आणि निघून सांगितलं, “ज्या घरात मी एक तासही घालवू शकत नाही, तिथं मला आयुष्य काढायला लावू नका.' हे सारं शहाणपण येतं वाचनातून.

 ‘डोळ्यात वाच माझ्या, गीत भावनांचे' म्हणणारा कवी खरा भावसाक्षर होता. माणसास केवळ साक्षर होऊन चालणार नाही. तो भावसाक्षर हवा. भावसाक्षरता येते वाचनातून. ‘वाचता येणं म्हणजे तुमचं वाचन समृद्ध असणं. सत्यनारायणाची पूजा सांगणाच्या भटजीप्रमाणं वाचणं म्हणजे वाचन नव्हे. ते फक्त उच्चारणं असतं. उच्चार व वाचनातला फरक नित्य वाचनातून

शब्द सोन्याचा पिंपळ/२०