पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/207

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

थाप मारून घेणं. मुलंमुली, सूनजावई ज्यांना त्यांना आपले संसार असतात. ते त्यांच्यात रममाण. आपण आता पानांवर नाही, तर मार्जिनमध्ये गेल्याची अनुभूती म्हणजे विषादच नसतो, तर ऊर्मी, ऊर्जा हरवण्याची हताशा विशद करणारी असते. ‘ने रे एकदा वर’, ‘लागले नेत्र पैलतीरी’, ‘गोव-या पोहोचल्या स्मशानात, आता फक्त तिरडी पोहोचवायची वाट' अशी निरवानिरवीची, निर्वाणीची भाषा म्हणजे संध्याछाया भिवविती हृदया' अशीच अभिव्यक्ती. ‘कुठे दडून बसलास रे, ने लवकर' म्हणणं म्हणजे भवसागराचा वीट नि जगणं असह्य झाल्याची साक्ष! 'देह जळो नि फुली उजळो' म्हणत दिवस काढणंही कठीण होतं. असं वाट बघत जगण्यापेक्षा मरणच बरं, असं कितीही वाटलं, तरी ते कुणाच्या हातात नसतं? ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट' म्हणत पतिपत्नीतील स्पर्धा म्हणजे विधुर, विधवा म्हणून जगणं नाकारणं! पण, तेही काळाच्या मुठीत बंद असतं. हाती असतं फक्त मरण येईपर्यंत जगणं!

▄ ▄

शब्द सोन्याचा पिंपळ/२०६