पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/204

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यातून त्याला जगण्याच्या खाचाखोचा, खाचखळगे समजत, उमजत राहतात आणि तो रोज अनुभवसंपन्न, शहाणा होत राहतो.

 मुलामुलींचं कुमार, किशोरी होणं म्हणजे स्वतःचं विश्व तयार होणं. 'मी', 'माझे' असं भान येणं. हक्क, कर्तव्याची जाणीव, जबाबदारीची जोखीम यातून तो स्वतःला आजमावत आत्मशोध घेत असतो. चांगलं काय नि वाईट काय हे कळत नसलं, तरी दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, हे त्याच्या एव्हाना पचनी पडलेलं असतं. मग गुरुजींच्या सांगण्यातून संगतीचे, संगतिदोषांचे भान येतं. आईबाबांच्या दटावणीतून अभ्यासाचं वळण लागतं. त्याच वेळी ताई, दादा, मोठे मित्र यांच्या ‘धरि शस्त्र मी न हाती, सांगेन युक्तीच्या गोष्टी दोन-चार' अशा स्वरूपाच्या अनौपचारिक शिक्षणाचे महत्त्व मोठ्ठ झाल्यावर उमजतं. तोवरचं जीवन म्हणजे 'आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे' असंच असतं. ‘मोही रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले अशी ती अवस्था म्हणजे जगण्याचं गारूड नि सुंदर स्वप्न असतं.

 मनात हुरहूर नि काळजाची झुरझुर म्हणजे आयुष्याचा अनमोल ठेवा. किंकर्तव्यविमूढ ही अवस्था म्हणजे ‘खाये तो पछताये, न खाये तो भी!' कळतं पण वळत नाही, असे ते दिवस. घरापेक्षा बाहेरचं जग अधिक मोहक वाटू लागतं ते प्रलोभनाचा बाजार तेज होऊ लागल्यानं. आजूबाजूचे जे चांगलं सांगतात ते वैरी, दुश्मन वाटू लागतात. वाईट ते आकर्षक असतं, हे न कळण्याच्या त्या दिवसांत चकाकतं ते सोनं वाटत असतं. मित्रमैत्रिणींचा सहवास, संगत, संवाद म्हणजे सर्वस्व वाटण्याचे ते दिवस वसंतापेक्षा मनोहारी असतात खरे! समलिंगी सहवास नि भिन्नलिंगी आकर्षण, असं दुहेरी गारूड! नक्की काहीच कळत नसतं. काय खरं, काय खोटं? चाचपडणं, चाचपणं असं फुकत फुकत जीवनाचा आस्वाद घेणं, मिटक्या मारण्यापेक्षा कमी रंगतदार नक्कीच नसतं. एकाच वेळी भीती नि जिज्ञासेचं द्वंद्व. प्रत्येक अनुभव नवाकोरा, हवाहवासा वाटणारा. कुतूहल म्हणजेच तर जीवन नाही ना, असा संभ्रम पडण्याचा हा काळ, जगण्याची अनिवार असोशी देऊन जातो नि मोठं होण्याची महत्त्वाकांक्षा. मिशा केव्हा फुटतील, पाळी म्हणजे शिसारी; असं एकीकडे नि दुसरीकडे गुफ्तगूचा माहौल! सिक्रेट सेव्हनचा हा काळ म्हणजे रोज काहीतरी नवं कळणं, मिळवणं नि गमावणं पण!

 ‘आहे मनोहर तरी, गमते उदास', असं वाटणाच्या तारुण्याच्या उंबरठ्यावरचा काळ म्हणजे सांगता येत नाही आणि सोसवतही नाही, असं काहीतरी. ‘धरलं तर चावतं, नि सोडलं तर पळतं.' सारं जग कवेत घ्यायच्या

शब्द सोन्याचा पिंपळ/२०३