पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वाचनाने जग बदलते




 माणूस नेहमी अस्वस्थ असतो. त्याला प्रत्येक क्षणी काहीतरी सांगायचं, बोलायचं, समजवायचं असतं. या अस्वस्थतेतूनच तो बोलू, लिह, विचारू लागला. पहिल्यांदा तो हे सारं हावभावाने करायचा. त्याच्याकडे भाषा नव्हती. मग ती काळाच्या ओघात आली. आधी त्यानं अक्षरं निर्माण केली. ती होती चित्रं, चिन्हं! पुढे त्याला विस्ताराने काही सांगावं वाटू लागलं. मग तो अनेक अक्षरांनी सांगू लागला. ‘ख’ म्हणजे आकाश. 'ग' म्हणजे गमन. म्हणून झाला खग. खग म्हणजे पक्षी. शब्द असे बनले तरी त्याचे समाधान होईना. मग तो वाक्यात बोलू लागला... शब्द जमवले. त्याची वाक्यं झाली. ती सुरुवातीस काव्यमय होती... म्हणून आपलं सारं प्राचीन साहित्य काव्यमय... रामायण, महाराभारत, भगवद्गीता हे सर्व असंच काव्यमय दिसतं.

 वाचन, लेखन, गणन या माणूस विकासाच्या प्रारंभिक खुणा. त्यातही वाचनाने माणसास अन्य प्राण्यांपासून अलग केले. सर्कशीतले प्राणी... नाचतात, खेळतात, चित्रं काढतात पण वाचू नाही शकत. ‘वाचतो तो माणूस' ही माणसाची खरी व्याख्या, खरी ओळख! लिहिलेले अंक, अक्षरे ओळखणं... त्यांची संगती लावणं... विचार करणं, समजून घेणं म्हणजे वाचणं. घोकणं आणि वाचणं यात फरक आहे. एकदा का तुम्ही पुस्तकं वाचू लागला की, मग तुमचं जग बदलू लागतं. तुम्हाला चांगलं-वाईट समजतं. पुस्तकं वाचतो तो निसर्ग वाचू शकतो... तो चित्रं वाचू शकतो. चित्रं पाहायची नसतात, वाचायची असतात हे किती जणांना माहीत आहे?

शब्द सोन्याचा पिंपळ/१९