टाय, बूट सर्व मिळतं. मिळत नाहीत आई बाबा. शिक्षक शिकवतात. त्यांना भेटत नाहीत. त्यांच्याशी बोलत नाहीत. या मुलांना मित्र मैत्रिणी राहिल्या नाहीत. खेळता येत नाही. असंवाद, अलिप्तता एकटेपण त्यांचं जीवन होत आहे. भौतिक समृद्धी वाढते आहे. भावनेचा दुष्काळ पसरतो आहे.
बालसाहित्यिकांपुढील खरा प्रश्न मुलांचं वर्तमान वंचित जीवन आहे. मुलांचं जग समजून लिहा. लिहिण्यापेक्षा त्यांच्याशी जीवाभावाचं बोला. ती प्रेमाला पारखी पाखरं बनत आहेत. तुम्ही बालपारखी व्हा. त्यांना हसवा. फिरवा, नाचवा. ती त्यांची खरी गरज आहे. साने गुरुजींचा पाझर परत एकदा फुटला पाहिजे. मुलांचं दुःख पाहून दुःखी होणारे शिक्षक, पालक, लेखक हवेत. मुलांचं मन गुंतेल असं साहित्य हवं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सारंच नवं आहे. पृथ्वी तापली आहे, आग वणवा होतो आहे. तेज लोपले आहे. वायू गळती सुरू आहे. आकाश फाटलं आहे. माणूस जूळेल तर सारं भरून येईल. मुलांसाठी आपण आपल्या मनात जागा करू या. जागे राहू या. मुलांना जागे ठेवू या.
जय जगत्! बाल जगत्!!
▄ ▄