पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/140

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हमीदुल्लांनीही केले. 'जैमती भोजा', 'एक और युद्ध’, ‘समय संदर्भ', ‘ख्याल भारमली', 'हर बार’, ‘उलझी आकृतियाँ' ही त्यांची नाटके खूप गाजली. ‘जमैती भोजा' हे अगदी अलीकडे प्रकाशित झालेलं नाटक राजस्थानातील बगडावत देव नारायण महागाथेवर आधारित आहे. वृत्तपत्रातील कात्रणांप्रमाणे तुटक प्रसंगांवर ‘एक और युद्ध' रचलं गेलं आहे. प्रयोगाच्या दृष्टीने या नाटकाचे आगळे महत्त्व आहे. चेक नाटककार कारेल चापेक यांच्या ‘आर. यू. आर.' चा प्रभाव ‘समय संदर्भ'वर स्पष्टपणे दिसून येतो. ‘हर बार' व ‘उलझी आकृतियाँ' ही दोन्ही नाटकं भ्रष्टाचाराचे चित्रण करतात. हिंदीतील प्रख्यात विनोदी लेखक हरिशंकर परसाई यांनी आपल्या ‘सदाचार का तावीज' कथेत भ्रष्टाचारास देव मानले आहे. ईश्वराप्रमाणे तो सर्वव्यापी, आकारहीन असून न दिसणारा, प्रचिती देणारा आहे म्हणून त्यांनी भ्रष्टाचारास ‘मायक्रोस्कोपिक एलिमेंट' मानले आहे. हमीदुल्लांनी कार्यालयापासून घरापर्यंत पसरलेल्या भ्रष्टाचाराचे चित्रण उपरोक्त नाटकांत केले आहे.

 रिजवान जहीर उस्मानांची ‘लोमडियाँ', 'सुन लडकी दबे पाँव आते है। मौसम' ही नाटके रंगमंचावर आली व गाजलीही. डॉ. राजानंद यांची ‘गुंफा', 'बोल मेरी मछली कितना पानी', 'बाढके बाद', 'ग्राण्ड फादर उर्फ दादाजी' ही नाटकेही याच परंपरेतील म्हणून सांगता येतील. मराठी नाटकांचे हिंदी अनुवाद हिंदी नाट्यसृष्टीचे एक आकर्षणकेंद्र बनली आहे. राजस्थानी हिंदी रंगमंचावर जयवंत दळवी, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर यांनी अनेक नाटके हिंदी रूपांतरात सादर झाली आहेत.

 कविता, कथा, कादंबरी, नाटक या प्रमुख साहित्या विधानांप्रमाणेच निबंध, एकांकिका, शब्दचित्र, समीक्षा, पत्रकारिता, प्रवासवर्णन इत्यादी प्रांतात राजस्थानी लेखकांनी मोलाची भर घातली आहे. राजस्थानचे स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्य हे हिंदीच्या राष्ट्रीय प्रवाहानुरूप लिहिले गेले आहे. वर सांगितल्याप्रमाणे राजस्थानी मातीचा स्पर्श असलेले हे साहित्य सांस्कृतिक संदर्भात वेगळे वाटत असले, तरी ते हिंदी साहित्य प्रवाहाचे अभिन्न अंग म्हणूनच पुढे येते. या साहित्यास स्वतंत्रपणे ‘राजस्थानी साहित्य अशी उपाधी देता येणार नाही. लोकजीवन व लोकसंस्कृतीचा विलक्षण प्रभाव राजस्थानच्या स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्यावर आढळतो. सामंती प्रथेपासून मुक्त होऊन आधुनिक भारतीय जनजीवनाच्या प्रवाहात येऊन मिसळण्याची तीव्र इच्छा या साहित्यात व्यक्त होते. राजस्थानी लेखक हा प्रांतवादात

शब्द सोन्याचा पिंपळ/१३९