पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/137

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निर्माण करणाच्या त्यांच्या कथा वाचकांना अंतर्मुख करतात. ग्रामीण संस्कृतीचे सुंदर चित्रण त्यांच्या अनेक कथांतून दिसून येते. यशपालांच्या साम्यवादी चिंतनाचा वसा घेऊन रांगेय राघवांनी हिंदी कथेत यथार्थवादी चित्रण परंपरेचा विकास केला. याच काळातील श्री. विजयदान देथा यांनी राजस्थानी कथा साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यांनी पारंपरिक लोककथांना वेगळे वळण देऊन त्यांच्या माध्यमातून आधुनिकतेचा आविष्कार केला आहे. यादवेन्द्र शर्मा ‘चन्द्र' यांनी ‘राम की हत्या', 'एक देवता की कथा', 'एक इन्सान की मौत’, ‘एक इन्सान का जन्म' इत्यादी कथांतून मानवी संबंधांचे सुंदर चित्रण केले आहे. अशाच प्रकारच्या कथा सुमेरसिंह दईया, विशन सिन्हा यांनी लिहिल्या आहेत. मन्नू भंडारींच्या ‘ऊँचाई’, ‘चश्मे', ‘अकेली', ‘क्षय', 'यही सच है', 'नशा' या कथांनी हिंदी कथेत नवे वळण निर्माण केले आहे.

 नव्या पिढीतील कथाकार रामकिशोर जेमिनी यांनी ‘देवालय की ओर', ‘कुहरा छंट गया', 'बीस मील का पत्थर' या आपल्या कथांतून नकारात्मक भूमिका मांडली आहे. या त्यांच्या नकारात्मक विचारांवर प्रेमवंद, यशपालांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. 'एक वृत्त और' , 'जर्सी’ , ‘यादें' या कथांतून प्रेमचंद गोस्वामींनी समस्याप्रधान कथा लेखनांची परंपरा दृढमूल केली. ग्रामीण जीवनाचे चित्रण करणा-यात दयाकृष्ण विजय एक महत्त्वपूर्ण नाव. ‘उलझन' हा त्यांचा कथसंग्रह या संदर्भात लक्षात राहतो. हरिशंकर परसाईंच्या हिंदी कथांतील नरम विनोदी सीताराम महर्षीच्या ‘माफ कीजिएगा'मध्ये दिसून येतो. ‘शाली साहबा की शादी' मनोहर वर्माचा कथासंग्रह श्रीलाल शुक्लांच्या कथांची आठवण करून देतो. सर्वश्री ईश्वरचन्दर, शरद देवडा, रमेश उपाध्याय, मणि मधुकर, स्वयंप्रकाश, राम जैसवाल, अशोक आत्रेय, शचीन्द्र उपाध्याय, परेश, राजानंद, पानू खोलिया, नफिस आफरिदी, आलमशहा खान अशा कितीतरी कथाकारांनी स्वातंत्र्योत्तर हिंदी कथेस पुढे नेऊन राजस्थानी योगदान स्पष्ट केले आहे. मानवी संबंधांच्या विविध दृश्यसंबंधांनी राजस्थानची स्वातंत्र्योत्तर हिंदी कथा समृद्ध झाली आहे.

 ३. कादंबरी

 हिंदी कादंबरीच्या विकासास गेल्या शंभर एक वर्षांची सुदीर्घ परंपरा कारणीभूत आहे. या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासाचे विहंगमावलोकन केल्यास असे दिसून येते की, हिंदी कादंबरीच्या प्रारंभापासूनच तिचा राजस्थानच्या मती व मातीशी घनिष्ठ संबंध जडलेला आहे. हिंदीतील

शब्द सोन्याचा पिंपळ/१३६