पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या काव्यास प्रयोगवादी काव्य अशी संज्ञा देऊ केली आहे. पुढे नवकाव्य म्हणूनही ते ओळखण्यात येऊ लागले. हिंदी कवितेतील स्वातंत्र्योत्तर युगाचा प्रारंभ हा दुस-या ‘तारसप्तका' (१९५१) पासून मानायला हवा. निसर्गात रमलेल्या व आत्मा परमात्म्याच्या संघर्षात गुंतून राहिलेल्या हिंदी कवितेत व्यक्तिवादी चिंतनाची झळाळी आली. सर्वश्री मुक्तिबोध, अज्ञेय, गिरिजाकुमार माथुर, केदारनाथ, अग्रवाल, नागार्जुन, शमशेर बहाद्दर सिंह, केदारनाथ सिंह, भवानी प्रसाद मिश्र, धर्मवीर भारती, नरेश मेहता, सर्वेश्वर दयाल सक्सेना, कुंवरनारायण सारख्या कवींच्या काव्य प्रतिभेने हे युग प्रभावित झाल्याचे दिसून येते. राजस्थानात स्वातंत्र्योत्तर काळात जे काव्य लिहिले गेले त्यावर उपरोक्त कवींचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. या काळात राजस्थानमध्ये अनेक कवितासंग्रह जसे प्रकाशित झाले, तसेच अनेक नियतकालिके उदयाला आली ती याच काळात. मणि मधुकर लिखित ‘खंड खंड पाखंड पर्व' यासारख्या दीर्घ कवितेपासून ते ओमकार पारीखच्या लघुतम काव्यापर्यंत अनेक आकार, प्रकारच्या कवितांनी स्वातंत्र्योत्तर हिंदी कविता बहरलेली व भारलेली दिसून येते.
 रामगोपाल (‘आयाम' १९६१), जुगमन्दिर तायल (‘धूप भरी सुबह १९६४), डॉ. रणजीत ('ये सपने ये प्रेत' १९६४), हरीश भदाणी (‘सुलगते पिंड' १९६६), कन्हैयालाल सेठिया (‘खुली खिडकी, चौडे रास्ते' १९६७), त्रिभुवन चतुर्वेदी (हथेलियों में ब्रह्मांड' १९७0), ओमकार पारीख (‘एक पंख आकाश') सारखे कवी या काळात उदयाला आले. त्यांनी लिहिलेल्या कवितांमध्ये निसर्गवर्णनाची नवी दृष्टी आढळते. प्रेमानुभूतीतील नवनवे संदर्भ मानवाच्या समग्र जीवनास स्पर्शणारे आहेत. समाजातील द्वंद्वात्मक संबंधाचे मार्मिक चित्रण हे या कवितांचे ठळक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. राजस्थानी मातीचा मोहक गंध या कवितेत आपसूकच दिसून येतो.

 राजस्थानात स्वातंत्र्योत्तर काळात नवकवितेस आंदोलनाचे स्वरूप आले असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही. केवळ कवितेस समर्पित असलेली नियतकालिके प्रकाशित करणे हे धाडसाचेच काम असते. पण राजस्थानात मात्र तसे धाडस लीलया घडले आहे. 'लहर', ‘वातायन', 'बिंदू’, ‘अकथ', ‘कविता' ही नियतकालिके या संदर्भात लक्षात घेता येतील.

 राजस्थानातील स्वातंत्र्योत्तर हिंदी काव्य हे संख्या आणि गुण दोन्ही कसोट्यांवर सफल दिसून येते. राजस्थानातील कवींनी आधुनिक जीवनबोधाचे सुंदर चित्र उभे केले आहे. त्यात अनुभूती वैचित्र्याबरोबर शैलीची विविधताही

शब्द सोन्याचा पिंपळ/१३४