पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
राजस्थानचे स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्य



 भारतीय साहित्याचे प्रांगण हे मराठी, हिंदी, गुजराथी, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू, बंगालीसारख्या विविध भाषासाहित्याने फुललेले आहे. या साहित्यात एका भाषेत विविधभाषी लेखकांनी केलेल्या योगदानाचा जर विचार करायचा झाला, तर हिंदी ही एक अशी समृद्ध भाषा आहे की जिच्यात विविध भाषांच्या साहित्य विधांचे प्रवाह येऊन मिसळलेले आहेत. त्यामुळेच आजमितीस तरी भारतीय साहित्य प्रतिनिधित्व हिंदीकडे देण्याशिवाय पर्याय दिसत नाही. त्याचे प्रतीक म्हणूनच आज विदेशात हिंदी भाषेतील साहित्य भारतीय म्हणून ओळखले जाते. भारतात दूरदर्शनसारख्या प्रचार माध्यमाने तर अलीकडे हिंदीस व्यवहाराने राष्ट्रभाषेचा दर्जा दिला आहे. राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यासाठी प्रादेशिक साहित्याचे हिंदी रूपांतर आवश्यक झाले आहे. हिंदी भाषेत विविध प्रादेशिक भाषा साहित्यांचे अनुवाद मोठ्या प्रमाणात होतात. शिवाय हिंदी साहित्यास राष्ट्रीय साहित्याचा दर्जा प्राप्त होणे क्रमप्राप्त आहे. ज्या विविध हिंदी भाषी प्रदेशांनी हिंदीस समृद्ध केले आहे त्यात राजस्थानचे योगदान महत्त्वपूर्ण मानावे लागेल. हिंदी भाषा व साहित्याच्या प्रारंभिक कालापासूनच राजस्थानचा दृढ संबंध आहे. हिंदीची बोली म्हणून राजस्थानी हिंदीचे आगळे महत्त्व होते व आहे. परंतु राजस्थानची साहित्यिक भाषा हिंदीच आहे. आज राजस्थानी साहित्य हे हिंदी साहित्याचे अविभाज्य अंग बनले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात तर राजस्थानने साहित्य सृजन क्षेत्रात कमालीची आघाडी मिळविली आहे.

 १. कविता

 स्वातंत्र्योत्तर हिंदी काव्य हे इतिहासाच्या चश्म्यातून पाहावयाचे झाले, तर त्यास उत्तर छायावादी काव्य म्हणून संबोधायला लागेल. हिंदी समीक्षकांनी

शब्द सोन्याचा पिंपळ/१३३