पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाज मान्यतेपासून दूर, उपेक्षित जात व धर्म वास्तवाच्या परिघाबाहेर सतत जागण्याचा संघर्ष करणारा व अस्तित्वाची निकराची लढाई लढताना दिसून येतो. त्यात अनाथ, निराधार, पोरके, परित्यक्ता, अंध, अपंग, मतिमंद, मूक, बधिर, वृद्ध, कुष्ठरोगी, देवदासी, विधवा, वेश्या, कुमारीमाता, हुंडाबळी, बलात्कारी, दुभंगलेली कुटुंबे, विस्थापित अशा अनेक प्रकारे उपेक्षेचं जीवन जगणारी मंडळी वेद, उपनिषदांपासूनच्या काळात जशी दिसतात तशी आजही. दया, करुणा, कणव, सहाय, भूतदया इत्यादीसारख्या वृत्तीमुळे हा मनुष्य समुदाय सामान्य मनुष्य समुदायापासून सतत वेगळा व उपेक्षित राहिलेला आहे. समाजाने दाखविलेल्या दया व धीरावर जगत हा समाजवर्ग धैर्याने संघर्ष करत आज स्वाभिमान व स्वत्वाची लढाई खेळत अधिकार आणि हक्काच्या जाणिवेने जागृत व प्रगल्भ होत समाजविकासात आपला वाटा मागू पाहात आहे. वेळोवेळी लिहिलेल्या साहित्यातून त्यांचा हा उद्गार दिवसेंदिवस आग्रह, आक्रोश यापुढे जाऊन अधिकाराची भाषा बोलताना दिसतो.

 भारताचा सारा सामाजिक विकास हा येथील राजकीय वास्तवामुळे नेहमीच ब्रिटिशांच्या इतिहासावर आधारित विकसित होत राहिला आहे. येथील समाज वास्तव, समाज परिवर्तन, सामाजिक कायदे, राजकीय व आर्थिक परिवर्तन या सर्वांमागे ब्रिटिश राजसत्ता व समाजसत्ता पायाभूत राहिली आहे. भारतीय राज्यघटनेने स्वतःला कल्याणकारी राज्य (Welfare State) म्हणून घोषित केले. त्यामागेही ब्रिटिश राज्यघटना कारणीभूत आहे, हे विसरता येणार नाही. ब्रिटनमध्ये चौदाव्या शतकात झालेल्या प्लेगच्या प्रादुर्भावात हजारो लोक मृत्युमुखी पडले व त्यातून निर्माण झालेल्या अनाथ, वृद्ध व विधवांच्या प्रश्नातून वंचितांच्या संगोपन, संरक्षण, पुनर्वसन इत्यादी यक्षप्रश्न सोडविण्याचे आव्हान निर्माण झाले. त्यातून इ. स. १३५१ मध्ये इंग्लंडमध्ये गरिबांचा कायदा (Poor law) अस्तित्वात आला. पुढे १४९५ मध्ये भिक्षेकरी व भटक्यांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी 'Tuber Act' अस्तित्वात आला. सोळाव्या शतकात प्रबळ धर्मव्यवस्थेने चर्चसारख्या संस्थांच्या माध्यमातून गरिबांना अन्न, वस्त्र, आरोग्य, शिक्षण देण्याच्या उद्देशाने कल्याणकारी संस्थेचे जाळे विणले. पुढे सन १७८२ मध्ये बेरोजगारांचा प्रश्न मिटविण्यासाठी ‘गिल्बर्ट अॅक्ट' आला. मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी इंग्लंडच्या धर्तीवर भारतात १८५७ मध्ये ‘डेव्हिड रिफॉरमेटरी स्कूल'ची स्थापना झाली. म. फुले, पंडिता रमाबाई, महर्षि कर्वे, महर्षि विठ्ठल रामजी

शब्द सोन्याचा पिंपळ/१२७