पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



मराठी वंचित साहित्य : उद्गम आणि विकास



 पार्श्वभूमी-

 जगातील सर्व भाषा व साहित्याचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून येते की, त्या-त्या भाषा व साहित्यात प्रथम तत्कालीन पुढारलेल्या वर्गाचे लोक लिहितात. हे लेखन ज्या वर्ग व व्यवस्थेमध्ये लेखन, वाचनाचे संस्कार विकसित होत असतात, त्यांच्याकडून प्रथमतः होते. लेखन-वाचनाचा पाझर विकासांच्या कालखंडात उच्चवर्गीयांकडून पाझरत पाझरत तो समाजातील तळागाळाच्या वर्गापर्यंत पोहोचत राहतो. त्यामुळे सर्व भाषांतील लेखन व्यवहारात प्रारंभीच्या काळात शोषक, सत्ताधारी, सामंत, सरंजामदार, दरबारी, आश्रित आदी कलाकार लिहितात. पुढे हा प्रवास जनसामान्यांपर्यंत पोहोचतो.

 भारतासारख्या खंडप्राय देशातील भाषा व साहित्याचा व्यवहार हा धर्म, जात, वर्ग, व्यवस्थेने मोठ्या प्रमाणात नियंत्रित केलेला आढळतो. भारतीय साहित्याचा मूलाधार संस्कृत भाषेचे साहित्य असल्याने आपोआपच प्राचीन साहित्याचा धांडोळा घेतल्याशिवाय आधुनिक साहित्याची मांडणी करता येत नाही. वेद, उपनिषद, रामायण, महाभारत अशा सर्व साहित्याचा अभ्यास करताना हे लक्षात येते की, प्रत्येक काळात समाजाच्या सर्व वर्ग व वर्णाचे प्रातिनिधिक असे चित्रण असते. आपल्या साहित्याचा प्रारंभ देवादिकांच्या कथांनी झाला. त्यात अवतार आणि चमत्कारांचे आश्चर्य जसे होते तसे त्या व्यवस्थेतील उपेक्षिताचे अश्रूपण!

 महाभारता राजा, राजकुमार यांच्या कथा जशा आढळतात तशा दासदासीच्या शापित जीवनाचे उद्गारही! इथे समाजमान्य विवाह संबंधाची चर्चा आढळते तशी विवाहपूर्ण संबंधातील संततीची पण. तिथं निपुत्रिक

शब्द सोन्याचा पिंपळ/१२५