पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परिवर्तनावरचा विश्वास, आशावाद उफाळून येतो. त्यातून जीवनाविषयीची सकारात्मकताही व्यक्त होत असते.

 - घडीभर अंधार राहील, नंतर पहाटच आहे...

 याच वस्तीतून आपला सूर्य येईल...

 -थोर भल्या भल्या, क्षणात जिंकीन...

 - ज्या हातांनी डागली तोफ त्या पवित्र हातांचे आशिष घेईन...

 - तान्यांच्या पुढची दुनिया माझ्या नजरेत आहे...

 या कवीचं जग खुराड्यातलं असलं तरी त्याचं तत्त्वज्ञान मानवाधिकारांची पखरण करतं. 'माणसाइतका समर्थ सृजनात्मा मला भेटला नाही', असं निक्षून सांगणारे कवी नारायण सुर्वे म्हणजे माणसांचं मोहोळ होतं. तो जनवादी कवी होता. त्याला व्यक्तिगत काही आकांक्षा नव्हती. ‘होता सकळ विश्व बदलण्याचा ध्यास आणि मग तो शब्दांनाच शस्त्र करतो, ग्रंथ हेच त्याचे विश्व बनतं आणि त्यासह मग तो जीवनास सामोरा जातो. ज्यांना शब्द जागवताही आला नाही त्याला जगताही आलं नाही. त्यांची कीव अशासाठी करतात की ते जीवनभर शब्दसाधक राहिले, शब्दास जागले. साय पांघरलेले शब्द त्यांना रोज भेटायचे ग्रंथाग्रंथातून. पण केवळ ग्रंथ हे त्यांचे जीवन नव्हतं. त्यातून ते चेहरे वाचायचे, माणसं समजून घ्यायचे. शब्दात खराब झालेला हा कवी. मात्र त्याने अनेक शब्दांना अमर केलं. शब्दांतून भविष्य निर्मिणारा हा कवी त्यानं माणुसकीचा मळा कवितेतून फुलवला.

 'ऐसा गा मी ब्रह्म’, ‘सनद', 'जाहीरनामा', 'माझे विद्यापीठ' ही त्यांच्या कवितांची नुसती शीर्षकं न्याहाळली तरी सुर्वे यांच्या कवितेची समूह मानसिकता, जनवादिता स्पष्ट होते. या कवितेत सामान्य माणसावर होणाच्या हर त-हेच्या अन्याय-अत्याचाराचे वळ उठलेले आहेत. ती अत्याचारी माणसांचे पीळ नोंदवते. अत्याचार सहन करून मुक्ती मिळत नाही म्हणून ती बंड, क्रांतीची भाषा करते. तिला जगाच्या उफराट्या अन्यायाबद्दल त्वेष आहे नि चीडही, नफरत मात्र नाही. तीत दुस्वास नाही. असेलच तर एक उजळ मार्ग निर्मिण्याची मनीषा. त्यासाठी उभी हयात जाळण्यास तो तत्पर दिसतो. सात जन्माच्या दारिद्रयाची झीट त्यांच्या सर्व कवितांतून व्यक्त होते, कारण ती त्याला समूळ नष्ट करायची आहे. त्यासाठी तो सर्वच समर्पण करू इच्छितो. तो एक दृढसंकल्प कवी आहे. सुर्वे आपल्या सर्व कवितांतून एका समाज जागल्याची भूमिका उठवताना दिसतात

शब्द सोन्याचा पिंपळ/१२२