पत्रव्यवहारात स्त्रियांची नावे अपवाद आहेत. यावरून सन १९४८ ते ५0 दरम्यान स्त्रिया अशिक्षित होत्या, त्यांचे लेखन, वाचन अपवाद होते, हे स्पष्ट होते. या नोंदीत संजीवनी मराठे, दुर्गा भागवत, इंदुमती जगताप, विद्या पाटील, सखुबाई आपटे, सोनुताई मरगुडकर, कमलाबाई होस्पेट, पुष्पलता अमीन, सुधा माने (सुंदर पत्रे!), शरयू गांधी, अनुसया घुर्ये नावे आढळतात. दुर्गा भागवतांचे पहिले लेखन साधनेत प्रकाशित झाले होते. साने गुरुजींच्या आग्रहावरून (त्याची नोंद प्रतिभा रानडे यांनी ‘बापलेकी'मध्ये केली आहे. पाहा पृ. १७). ते लेखन ('वाळूची पावले' हा लेख) मागवणारे पत्र साने गुरुजींची याच दरम्यान लिहिले असावे. सन १९५० मध्ये दुर्गाबाई भागवतांना दोनदा पत्र लिहिल्याची नोंद आढळते.
साने गुरुजी साधनेसंबंधाने विद्यार्थ्यांशीही पत्रव्यवहार करीत. अगदी इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांशी पण. दि. ०१.१२.१९४९ रोजी जळगावच्या इयत्ता सहावी (ब) मध्ये शिकणाच्या कमलाकर नारायण टेंबे या विद्यार्थ्यास लिहिलेल्या पत्राची नोंद या संदर्भात पाहता येते. अशा अनेक नोंदी आहेत. शिक्षक, वकील, डॉक्टर, पत्रकार, संपादक सा-यांशी साधनेचा संपर्क असावा, अशी साने गुरुजींची धडपड असे. आचार्य शांताराम गरुड, साहित्यिक शंकर सारडा, प्रा. चंद्रकांत पाटगावकर, जयानंद मठकर प्रभृतींना साने गुरुजींनी लिहिल्याची नोंद आहे. अन्य मान्यवरांत महाकवी प्रा. द. रा. बेंद्रे (ज्ञानपीठ पुरस्कृत कन्नड साहित्यिक), पु. ग. मावळंकर (पहिले लोकसभा सभापती), कवी वा. रा. कांत, सोपानदेव चौधरी, प्रा. कृ. ब. निकुंब, रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, प्रा. वसंत बापट, यदुनाथ थत्ते, एस. एम. जोशी, मधु दंडवते, ताराबाई मोडक, भाऊसाहेब रानडे, बा. य. परीट, वसंत पळशीकर, बगाराम तुळपुळे, राजा मंगळवेढेकर प्रभृतींचा उल्लेख करता येईल.
साधनेच्या खपासाठीही साने गुरुजी अनेकांना पत्रे लिहीत. राजा गवांदेंना दि. २८.०९.१९४८ ला लिहिलेले पत्र या संदर्भात नोंद घेण्यासारखे आहे. काही लोक ‘साधना प्रचारक म्हणून कार्य करत. उदा. वसंत पाटील, नंदुरबार त्यांच्याशीही गुरुजी पत्रव्यवहार करत असत, असे या जावक बारनिशीवरून लक्षात येते. साधना अनेक शाळा, महाविद्यालये, शासकीय विभागांना जात असे. त्या वेळचे शिक्षण खाते हे ‘पब्लिक इन्स्ट्रक्शन' नावाने ओळखले जाई. साधना लेबर डिपार्टमेंटमध्येही जात असे.