टपाल तिकीट/पाकीट पाठवले असावे. त्या वेळी तशी पद्धत होती. यातून साने गुरुजींची सार्वजनिक जीवनातील आर्थिक सचोटी व पारदर्शकता स्पष्ट होते. त्यातून आज आपणा सर्वांना भरपूर शिकता येण्यासारखे आहे. या ११८0 वाचकांत नाना कुंभोजकर एकटे काय ते साधनेस तोशीस न देणारे निघाले. त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे. ते आज हयात आहेत. सध्या मुक्काम सांगली.
ही सारी जावक बारनिशी साने गुरुजींच्या हस्ताक्षरातील आहे. त्यावरून साधनेत त्या वेळी लिपिक नसावा हे स्पष्ट होते. संपादक काय करीत नसत? लिहिणे, पत्रव्यवहार करणे, नोंदी ठेवणे, प्रुफे तपासणे, पत्ते लिहिणे, अंकाच्या घड्या घालणे, तिकिटे चिकटवणे, पोस्टात अंक टाकणे, अंक विकणे आदी सारी कामे साने गुरुजी करीत असल्याच्या नोंदी वेगवेगळ्या संदर्भात आढळतात. यातून आजच्या पत्रकार संपादकांना बोध घेता येईल. (अनुकरण अवघड खरे!) या सर्व नोंदी काळ्या शाईत आहेत. अपवाद निळी शाई. यावरून काळ्या शाईची साने गुरुजींची पसंती स्पष्ट होते. दैनंदिनी, हस्तलिखिते, पत्रव्यवहारातून यास दुजोरा मिळतो. प्रारंभिक हस्तलिखिते निळ्या शाईतील आढळतात. साने गुरुजींच्या लेखनात खाडाखोड अपवादाने आढळते. बावीस महिन्यातील ११८0 नोंदींपैकी फक्त एकावर खाट आहे, खाडाखोड मात्र नाही. प्रत्येक काम समरसून करण्याची साने गुरुजींची मनस्विता यात दिसून येते. कोणतेही काम एकात्मतेने करायचे. ते छोटे-मोठे नसते. ते काम ‘कार्य' असते हे आपण समजून घेतले तर साने गुरुजींची ‘कार्य संस्कृती' उमजेल.
मागील लेखात मी साने गुरुजींचा संपर्क सर्व जाती, धर्मातील लोकांशी व सर्वदूर भारताशी होता हे स्पष्ट केले आहे. या जावक बारनिशीतील पत्त्यांवरून त्यास बळकटी मिळते. या सूचीवरील पत्त्यातील व्यक्तींचे सध्याचे उत्तराधिकारी शोधल्यास ‘साधना' नि साने गुरुजींसंबंधी पत्रव्यवहार, कागदपत्रे, जुने अंक शोधणे शक्य आहे. (अर्थात त्यांनी ते जपून ठेवले असतील तर!) आपणाकडे जुनं ते सोनं' फक्त म्हणीत आहे. सांस्कृतिक संचित जपण्यातील आपल्या अनास्थेने आपला इतिहास, संस्कृती कबाड्यास कवडीमोलात, रद्दीच्या भावात आपण विकून टाकून आपली सांस्कृतिक दिवाळखोरी पुरेशी सिद्ध केली आहे. हे थांबायला हवं. जुनं जपायला हवं.
टपाल खर्च एप्रिल १९४९ पासून ६ पैशावरून ९ पैशावर गेलेला आढळतो. याचा अर्थ त्या वेळी टपाल खर्च - पोस्टाचे दर वाढले, हे स्पष्ट होते.