निफाड, शिरपूर, श्रीगोंदे, ठाणे, डहाणू, पालघर, वसई अशी बातमीदारांची नावे वाचली की साधनेत संपूर्ण महाराष्ट्राचे (संयुक्त प्रांत) प्रतिबिंब असावे अशी योजना लक्षात येते. यात साधनेच्या एका अंकाचा खर्च (पृ. ३५ ऑगस्ट) आहे. तो पहिल्या अंकाचा खर्च म्हणून महत्त्वाची नोंद ठरते. तो खर्च असा - कंपोझिटर्स २00, कागद - ८0, भाडे - ७0, शाई - ५५, ब्लॉक्स - २0, गाडी, चहा इ. - (प्रवास) १0, किरकोळ - २० असा रुपये ४१५ चा खर्च नोंद आहे. याच डायरीत साने गुरुजींनी मार्च महिन्यात व्यक्तिगत खर्च नोंदला आहे. तो असा - इलेक्ट्रिक/गॅस - १, भाडे- ४, दुधवाला - ४, चहा- २, तेल, साबण वगैरे - १ असा मासिक खर्च १२ रुपये करणारे साने गुरुजी व्यक्तिगत जीवनातही सामाजिक व्यवहाराप्रमाणे काटकसरी होते हे सिद्ध होते.
या दैनंदिनीच्या शेवटच्या आवरणाच्या आतील बाजूस साधनेची संभावित बोधवाक्ये नोंदली आहेत. आज साधनेत नोंदले जाते ते बोधवाक्य/ ध्येयवाक्य अंतिम खरे. पण त्यापूर्वी त्यांच्या मनात घोळत असलेली बोधवाक्य अशी होती -
स्वतंत्र भारती आता,
कुणा काही नसो कमी।
साधू विकास सर्वांचा,
करून शुभ साधना।।
अथवा प्राप्त स्वातंत्र्य राखू या,
करू या शुभंकर/समुज्वल।
करू/व्हावा विकास सर्वांचा,
साधना मंगल करू।।
या सर्वांमधून साधना ही स्वातंत्र्यरक्षणासाठी व सर्वांच्या विकासासाठी स्थापिली हे स्पष्ट होते.
सन १९४९ ची शेवटची डायरी - तीत फारसे लिहिलेले नसले तरी एक पान (७ जानेवारी) अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यात साधनेचा चार महिन्यांचा एकत्रित खर्च आहे. जमेकडे ८९,६१४ रुपये तर खर्च ८९,१५१ रुपये. ४६३ रुपये फायद्यात आणण्यासाठी. साने गुरुजी सव्वा वर्ष रात्रंदिवस झटत होते, एक करत होते पण साधना फायद्यात आणण्यासाठी साने गुरुजींना आपल्या पुस्तक लेखन, विक्रीचे मानधन ८00 रुपये जमा करावे