पान:व्यवस्थापनाची मूलतत्त्वे (Vyavasthapanachi Multatve).pdf/२०१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाव्यवस्थापकाची यशोगाथा
२२७
 

असं लिहिलेलं कागदपत्र कधीच मिळाले नाहीत. 'अत्यंत' हा शब्द लिहायची गरजच नसायची. एखादे ‘अर्जंट' लिहिलेले कागदपत्र मिळताच मी ते काम संपविल्याखेरीज उठत नसे आणि जर ते काम जमत नसेल तर मला ते कागदपत्र ज्या व्यक्तीने पाठविले असतील त्या व्यक्तीची भेट घेऊन ते काम का होऊ शकत नाही ते सांगायचो. तातडीने काम करायची जाणीव वा कृतीची जाणीव हे फार महत्त्वाचे आहे.

 सरकारी कार्यालय किंवा सार्वजनिक उद्योगात लोक नेहमी असं गृहीत धरतात की कृतीची जाणीव ही शक्य होणारी बाब नाही. काही वर्षांपूर्वी, मी धनबाद येथल्या एका सार्वजनिक उद्योगातील कंपनीत गेलो होतो. मी हावडाहून कल्का मेलने गेलो आणि मध्यरात्री धनबाद स्टेशनवर पोहोचलो. कंपनीकडून माझ्यासाठी गाडी येईल अशी माझी अपेक्षा होती. पण गाडी वगैरे काहीही नव्हती! स्टेशनबाहेर पाच-सहा मोटारगाड्या होत्या. रात्री धनबाद स्टेशनमध्ये खूप गाड्या येतात. मी विचार केला की त्या मोटारगाड्यांतील एक गाडी कंपनीची असेल - ड्रायव्हर झोपला असेल. मी एका ड्रायव्हरला जागे करून तो कंपनीचा ड्रायव्हर आहे का ते विचारलं. बिहारमध्ये, जेव्हा तुम्ही चुकीच्या ड्रायव्हरला अवेळी जागे करता तेव्हा तो तुमच्या पूर्वजांचा उद्धार करतो. असे काही अनुभव आल्यावर मी नाद सोडला. कंपनीच्या गेस्ट हाऊसकडे जायला एक टॅक्सी केली. सार्वजनिक उद्योग क्षेत्रात गेस्ट हाऊस ही फार गमतीची व्यवस्था असते. त्यांचं एकच असे गेस्ट हाऊस नसते - तर नेहमीचे गेस्ट हाऊस असते, व्हीआयपी गेस्ट हाऊस असते (महत्त्वाच्या व्यक्तींसाठी), व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस (अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी) असते. मला माझं गेस्ट हाऊस सापडेस्तोवर पहाटेचे दोन वाजले होते. मी तडक झोपायला गेलो. आठ वाजता प्रशिक्षण व्यवस्थापक भेटायला आला. तो म्हणाला, “मला अत्यंत वाईट वाटतंय. जो ड्रायव्हर स्टेशनला जाणार होता तो गेलाच नाही." मी विचारलं, “मग याबाबतीत काय करणार आहात तुम्ही?" “काय करू शकतो मी? सार्वजनिक क्षेत्र ना! तेही बिहारमध्ये!!! काहीच करू शकत नाही." मी म्हणालो, “कृपा करून त्या ड्रायव्हरला बोलवा." तो म्हणाला, “तुम्ही त्या ड्रायव्हरला काय सांगू शकणार? तुम्ही कंपनीतले अधिकारीही नाही आहात..." मी म्हणालो, “कृपया बोलवा त्याला." तो ड्रायव्हर आला. मी त्याला विचारलं, “नाव काय तुमचं?" तो म्हणाला, “तिवारी." मी म्हणालो, "तिवारीजी, मी काल मध्यरात्री धनबादला तुमचा पाहुणा म्हणून आलो आणि दोन वाजेपर्यंत मी धनबादमध्ये भटकत राहिलो! तुमच्या पाहुण्यांना तुम्ही अशी वागणूक देता?" तो म्हणाला, “साब, ये फिरसे नही होगा." दोन महिन्यानंतर मी पुन्हा तेथे गेलो - तो ड्रायव्हर हातात फलक घेऊन स्टेशनवर उभा होता. कृतीची जाणीव निर्माण करण्यासाठी नोकरीवरून निलंबित करण्याची धमकी देण्याची किंवा