पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गुन्हा आणि गुन्हेगारी या प्रश्नांकडे केवळ दंडसंहितेच्या आधाराने विचार करून चालणार नाही. दंडानुवर्ती शासन व प्रशासन आता कालबाह्य आले असून या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शासकीय यंत्रणेपेक्षा स्वयंसेवी संस्थांचा या प्रश्नातील जनसहभाग वाढवणे इ. उपायांवर भर देण्यात आला आहे. आपल्याकडील अभिक्षणगृह, अनाथाश्रम, स्वीकारगृह, निराश्रित मुलांची वसतिगृहे इ. संस्था आपण अकारण न्याय व पोलीस यंत्रणेच्या हवाली करून त्यांच्या प्रभावाखाली चालवितो आहोत. याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. वेळीच या संदर्भात आपण पावले उचलली नाहीत तर आजची मुले ही उद्याच्या राष्ट्र उभारणीतील दूरदर्शी गुंतवणूक आहे' असे म्हणण्याचा कोणताच नैतिक अधिकार आपणास राहणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
   हीच स्थिती ग्रामीण समाजाच्या विषमता व पुनर्वसनासंबंधीच्या प्रश्नांबाबत ही दिसून येते. ग्रामीण पुनर्वसन हा राजकीय सत्तेच्या उत्थान व पतनाचे साधन होता कामा नये. हा प्रश्न समाजकल्याणाचा एक अविभाज्य भाग व्हायला हवा, हे लेखकाचे प्रतिपादन या प्रश्नाशी आज झालेली राजकीय सांधेजोड नष्ट करण्यासंदर्भात विचारात घेण्यासारखा आहे. भूक नि संहार यांच्या मुलभूत कारणांची लेखकांनी केलेली चिकित्सा मती गुंग करणारी आहे.
   लेखकांनी विविध सामाजिक प्रश्नांसंदर्भात भविष्यकाळात घ्यावयाच्या समाजकल्याणविषयक धोरणांची चर्चा करण्याच्या उद्देशाने या ग्रंथाचा प्रपंच केला आहे. आठव्या योजनेची पुन्हा आखणी होत असताना प्रकाशित झालेला हा ग्रंथ नियोजकांनी मार्गदर्शक ग्रंथ म्हणून अभ्यासायला हवा. लेखकांनी जागोजागी आकडेवारी देऊन हा ग्रंथ अधिक वस्तुनिष्ठ बनला आहे. समाज कल्याणाची चिंता नि चिंतन करणा-या सर्व व्यक्ती नि संस्थांनी समाजकल्याणाची नवी संकल्पना विशद करणारा हा चिंतनात्मक ग्रंथ आवर्जून वाचायला हवा.
_____________________________________________________________________________________________________________________ • सामाजिक विकासावे प्रश्न व धोरण (वैचारिक)
लेखन - डॉ. शरदचंद्र गोखले
प्रकाशक - व्हीनस प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष - १९९०
पृष्ठे ३८६   किंमत १२५ रु.


वेचलेली फुले/३०